• Sat. Jul 4th, 2026
    Maharashtra Rain: दोन दिवस पावसाचे! महामुंबईसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट; 7 जुलैपर्यंत जोर कायम राहणार

    Maharashtra Rain Update: ठाण्यात सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी तीन हात नाका उड्डाणपुलावर किरकोळ अपघातामुळे मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी साठलेले पाणी, खड्डे आणि पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच कोंडीत यामुळे भर पडली.​

    मुंबई पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : जुलै महिन्यामध्ये पावसाचा वाढलेला जोर ७ जुलैपर्यंत कायम असून प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या अद्ययावत इशाऱ्यानुसार शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांसोबतच नाशिक, पुणे, सातारा घाट परिसरालाही शनिवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकेल, तर तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना रविवारीही रेड अलर्ट कायम आहे.

    गेल्या तीन दिवसांमध्ये कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा येथे १ जुलै रोजी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये ६९.६, २ जुलै रोजी २४ तासांमध्ये १५८.२ आणि ३ जुलै २४ तासांमध्ये रोजी १११.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तीन दिवसांमध्ये कुलाबा येथे ३३९.६ मिलीमीटर पाऊस पडला. तर सांताक्रूझ येथे १ जुलैला सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये ९६.३ मिलीमीटर, २ जुलैला २०४.६ तर ३ जुलैला १०१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे एकूण ४०१.९ मिलीमीटर पाऊस तीन दिवसांमध्ये नोंदला गेला. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३० या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. दिवसभरात कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर अधूनमधून पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे ३७ मिलीमीटर तर कुलाबा येथे ५१ मिलीमीटर पावसाची नोंद सायं. ५.३० पर्यंत झाली.

    Ritu Tawde | आजी-माजी महापौरांमध्ये जुंपली, पेडणेकरांकडून महापौर दालनाची रेकी, तावडेंचे गंभीर आरोप

    दोन जिल्ह्यांत अतिरिक्त पाऊसमान
    जून आणि जुलैची आत्तापर्यंतची मुंबईची सरासरी २४जून, २९ आणि ३० जून आणि गेल्या तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १ जून ते ३ जुलै या कालावधीत आत्तापर्यंत मुंबई शहरात ७८०.७ मिलीमीटर आणि उपनगरात ८१९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस असलेली पावसाची तूट आता दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊसमानापर्यंत पोहोचली आहे.

    मुसळधार पावसाचे कारण काय?
    महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती या आठवड्यातही कायम राहील, अशी शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात वायव्येकडील कमी दाबाचे क्षेत्र शनिवार, रविवारी दोन दिवसांत अधिक तीव्र होईल. हवेच्या खालच्या थरात वारेही विरुद्ध दिशेने वाहत आहेत. या प्रभावाखाली कोकण विभाग आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे.

    Maharashtra TimesMumbai Fire: इमारतीत अग्नितांडव, रहिवासी अडकले; जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरुन उड्या, मुंबईत थरार
    अंबा, कुंडलिका इशारा पातळीवर
    रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदी धोक्याच्या तर कुंडलिका नदी इशारा पातळीच्या पुढे गेली आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. अलिबाग शहरात सखल भागामध्ये पाणी साचल्याने रस्त्यांचा अंदाज येणे कठीण झाले आहे. शहरातील पीएनपीनगर, तळकरनगर तसेच रेवस बायपास रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

    घाट रस्त्यांची केंद्राच्या पथकाकडून पाहणी
    चिपळूण : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या कोकणातील घाट रस्त्यांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या टीएचडीसी या प्राधिकरणाचे पथक शुक्रवारी रत्नागिरी येथे दुपारी दाखल झाल आहे. नीरज अग्रवाल यांच्या पथकाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावरील सगळ्या घाट रस्त्यांची पाहणी करण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट, रायगड जिल्ह्यातील महाड-पुणे जोडणारा वरंधा घाट या घाटांची पाहणी शुक्रवारी या पथकाने केली आहे.

    Maharashtra TimesTukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडून आतापर्यंतचे सर्वांत कडक आदेश जारी; दूध भेसळ रोखण्यासाठी २५ नियम, सुट्ट्या दुधाबाबत काय सांगितलं?
    आंबेनळी घाट बंद
    अलिबाग : अतिवृष्टी व पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट ३ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जारी केले आहेत. घाटमाथ्यावर सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा