• Sat. Jun 6th, 2026

    Congress Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळांची अधिकृत माहिती, सुनेत्रा पवारांसाठी मार्ग मोकळा

    Congress Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळांची अधिकृत माहिती, सुनेत्रा पवारांसाठी मार्ग मोकळा

    Baramati Bypoll Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील उमेदवार मागे घेतल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाढली आहे.

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची अधिकृत माघार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बारामती: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने ही मोठी घोषणा केली असून, यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवल्यानंतर, हायकमांडने माघार घेण्यास हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर पत्रकार परिषदेतून हा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे नेते गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. काँग्रेसने या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाल्याचे मानले जात आहे.

    भाजपवर टीका

    पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी अजित पवार गटाच्या भाजपसोबतच्या युतीवर जोरदार टीका केली. “राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसारख्या विखारी पक्षासोबत राहू नये. सत्तेसाठी लाचार होऊ नये,” असे ते म्हणाले. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने अशी भूमिका घेणे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : जातीवरुन छळ, मानसिक त्रास; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, एसटी महामंडळात खळबळ

    ‘रोहित पवार, सुप्रिया सुळेंनी विनंती केली’

    दरम्यान, काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने संपर्क साधला जात होता, अशी माहितीही सपकाळ यांनी दिली. रोहित पवार यांनी आज सकाळीच त्यांची भेट घेऊन विनंती केली होती. तसेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

    “भाजपच्या विरोधात वैचारिक भूमिका म्हणून आम्ही ही निवडणूक लढवत होतो. मात्र अजित पवार यांच्यासोबत काम केल्यामुळे आणि भावनिक भूमिका लक्षात घेता राष्ट्रवादीकडून मघार घेण्याची विनंती करण्यात आली,” असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती, असेही त्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesSindhudurg News : स्पोर्ट्स बाईक आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक; मित्रांसोबत मालवण फिरायला गेलेल्या ओंकारचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    ‘सुनेत्रा पवारांनी केली होती विनंती’

    सपकाळ यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार यांनीही फोनवरून संपर्क साधत काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली होती. महायुतीतील विविध नेत्यांनीही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली होती. याशिवाय मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही दिल्लीत सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा