• Fri. Jul 3rd, 2026

    पाकिस्तानकडे जाणारं जहाज इराणने अडवलं

    ByMH LIVE NEWS

    Apr 7, 2026
    पाकिस्तानकडे जाणारं जहाज इराणने अडवलं

    इराण आणि अमेरिका यांच्यातील यु्द्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले आहे, त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या जहाजांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाच्या तेल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशातच आता भर समुद्रात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला जबर हादरा बसला आहे, तर भारताला लॉटरी लागली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत नेमकं असं काय घडलं ज्यामुळे भारताला मोठा फायदा झाला? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    पाकिस्तानकडे जाणारं जहाज…

    होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांना इराणची परवानगी घेणे गरजेचे आहे. अशातच आता पाकिस्तानचे सेलेन नावाचे जहाज अन्नसामग्री घेऊन कराची बंदराकडे निघाले होते. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीत पोहोचताच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने ते थांबवले. या जहाजाला पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर आता अशी माहिती समोर आली आहे की, पाकिस्तानकडे जाण्याऐवजी हे जहाज भारतातील मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले आहे. आता हे जहाज पुढील दोन दिवसांत ते मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. या एका घटनेमुळे पाकिस्तान-इराण संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

    जहाज 9 एप्रिलला मुंबईत येणार

    समोर आलेल्या माहितीनुसार, सेंट किट्स अँड नेविस देशाचे हे जहाज 23 मार्च रोजी यूएईमधील शारजाह येथून पाकिस्तानातील कराचीकडे निघाले होते. हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत पोहोचताच प्रवेश करताच इराणच्या IRGC नौदलाने त्याला वेढा घातला. या जहाजाला पुढे जाण्यासाठी परवानगी नाही असं सांगण्यात आलं. आता इराणच्या या कडक भूमिकेनंतर जहाजाने आपला मार्ग बदलला आहे. VesselFinder आणि MarineTraffic च्या माहितीनुसार हे जहाज आता सुमारे 10–11 नॉट्स वेगाने मुंबईकडे येत आहे. ते 9 एप्रिलपर्यंत भारताच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारताचा फायदा झाला असून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

    दरम्यान, इराणने न्यूयॉर्कमधील आपल्या मिशनमार्फत स्पष्ट केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याच्यासाठी प्रत्येक जहाजाने इराणी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास जहाज अडवण्यात येते. याआधी काही जहाजांवर हल्ला देखील झाला होता. मात्र भारतीय जहाजांना या मार्गाने प्रवास करण्यास इराणने अनेकदा परवानगी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed