“अशोक खरातला मी कधीही भेटले नाही, हे सर्व आरोप कपोलकल्पित असून माझ्याविरुद्ध रचलेले विषारी षडयंत्र आहे,” अशा शब्दांत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तृप्ती देसाईंच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
‘माझी कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी’
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच सक्रिय राहिले आहे. आमदार होण्यापूर्वीपासून मी माझे प्रत्येक काम पत्रकाद्वारे जनतेसमोर मांडत आले आहे. माझी तत्त्वे आणि कामाची पद्धत मी कधीही कोणापासून लपवलेली नाही. माझी संपूर्ण कारकीर्द जनतेसमोर एका उघड्या पुस्तकाप्रमाणे पारदर्शी आहे.”
‘ढोंगी बुवाबाजीवर माझा विश्वास नाही’
नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, “माझे आजोबा स्व. ॲड. श्रीपाद देशपांडे, आई लतिकाताई आणि वडील डॉ. दिवाकर गोरे यांनी माझ्यावर आधुनिक संस्कार केले आहेत. गेल्या पाच दशकांत मी कधीही कोणत्याही ढोंगी बुवा किंवा गुरूच्या दर्शनाला गेलेली नाही. माझी अढळ श्रद्धा केवळ देवदेवता, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, साईबाबा आणि दत्त महाराजांवर आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी मला कधीही तांत्रिक गुरूची गरज भासली नाही.”
Eknath Khadse : एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्येवर गुन्हा दाखल, अडचणी वाढणार? खडसेंची पहिली प्रतिक्रिया
‘नाशिकमधील भेटीचा दावा पूर्णतः खोटा’
तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांचं खंडण करताना त्या म्हणाल्या, “नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला सहा-सात वर्षांपूर्वी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि नि:संदिग्धपणे इंकार करते. अशा प्रकारच्या बातम्या पूर्णतः काल्पनिक आहेत. यात लवलेशही सत्य नाही.”
‘राजकीय द्वेषातून विषारी षडयंत्र’
या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, “उपसभापतीपद आणि मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये माझ्याबद्दल द्वेष निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातील माझे संसदीय कार्य आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केलेली माझी प्रशंसा काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना अपयश आले, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत.”
अधिवेशनात मौन का पाळले?
अधिवेशनादरम्यान या विषयावर का बोललो नाही, याचे स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी १३ मार्चलाच जाहीर केली होती. २३ तारखेला जेव्हा ही बातमी आली, तेव्हा मी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत होते. अधिवेशन सुरू असताना मी यावर भाष्य करणे म्हणजे चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. कारण चेअरवरून केलेले भाष्य हे सरकारला निर्देश असतात. म्हणूनच मी अधिवेशनापर्यंत संयम राखला आणि २६ तारखेला माझी भूमिका स्पष्ट केली.”
तृप्ती देसाईंचे आरोप
“शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोऱ्हे गेले पाच ते सहा वर्षे अशोक खरात याच्याकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? याचं कारण नीलम गोऱ्हे यांचे अशोक खरातसोबत चांगले संबंध होते”, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता.
