• Sat. Jun 6th, 2026
    Datta Meghe Passes Away : ‘दातृत्वाचा धनी हरपला’, दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

    ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी असायचा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : राज्याच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर आली असून भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता मेघे यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. नागपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कायमच सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच आयुष्यभर ते कार्यरत राहिले. त्यामुळेच एक लोकनेता अशी त्यांची प्रतिमा होती. विविध शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी विदर्भातील तरुणांच्या शिक्षणाची सोय तर केलीच आणि या संस्थाही नावारूपाला आणल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे एक मोठा आधार ज्येष्ठांना मिळाला.”

    “दातृत्व हे दत्ताभाऊंचे वैशिष्ट्य होते. अनेक गरिबांवर त्यांनी मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या. एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. वर्धा, नागपूर-विदर्भातील विकासाच्या राजकारणात त्यांनी कधीही पक्षीय भेद आणला नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सुद्धा त्यांचा सदैव पुढाकार असायचा. नव्या पिढीचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षात त्यांचे चाहते आहेत, हेच त्यांच्या यशाचे गमक. माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. अनेक प्रश्नांवर वडिलकीच्या नात्याने ते मार्गदर्शन करायचे. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. दत्ताभाऊंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

    दत्ता मेघे हे सौम्य, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जात होते. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक आणि वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. तसेच ते महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्यही होते. मंत्रीपदासह विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे आणि विकासकामांना प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.

    ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे त्यांचा जन्म झाला. साध्या पार्श्वभूमीतून पुढे येत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या मृदूभाषी स्वभावामुळे आणि समन्वयक वृत्तीमुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्ये लोकप्रिय होते.
    मेघे यांची राजकीय वाटचाल विविध टप्प्यांतून गेली. त्यांनी सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत त्यांनी आपला प्रभाव वाढवला. पुढे बदलत्या राजकीय समीकरणांनुसार त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तेथेही सक्रिय भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना राजकारणात संधी दिली होती, ही बाब विशेष उल्लेखनीय मानली जाते.

    राजकारणासोबतच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. ‘दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च’च्या माध्यमातून त्यांनी उच्च शिक्षणाला चालना दिली. त्यांच्या पुढाकारातून अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन महाविद्यालयांची स्थापना झाली. वर्धा येथे त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. तसेच त्यांनी उभारलेल्या रुग्णालयांमुळे सर्वसामान्यांना आरोग्यसेवा उपलब्ध झाली.

    केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. विविध सामाजिक आणि विकासात्मक प्रकल्पांमध्ये दोघांचा समन्वय पाहायला मिळत असे. त्यांच्या निधनामुळे गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्या घडल्या असून शिक्षण व समाजसेवेतील त्यांचा ठसा कायम स्मरणात राहील. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, समर्थक आणि मोठा अनुयायी वर्ग आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा