नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. खरातच्या ट्रस्टची सदस्य म्हणून काम पाहिल्याचं चाकणकरांनी मान्य केलं. पण अशोक खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती नसल्याचं त्या म्हणाल्या. मात्र यासोबतच त्यांनी वारकरी संप्रदायाचा उल्लेख केला. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. आमची खरातवर असणारी श्रद्धा ही अध्यात्मिक दृष्टीकोनातून होती, असं त्या म्हणाल्या होत्या. वारकरी संप्रदायाचा उल्लेख केल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांनी चाकणकरांना कठोर शब्दात सुनावलं. वारकरी संप्रदाय आणि भोंदूंचा काहीच संबंध नाही, असं म्हणत पौळ यांनी चाकणकरांना खडेबोल सुनावलेत. यासोबतच अयोध्या पौळ यांनी नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि महेश लांडगे यांच्यावरही सडकून टीका केली.