• Thu. Aug 6th, 2026
    Ashok Kharat Case : ‘रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करुन तातडीने अटक करा’, रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी

    रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांना सहआरोपी करुन अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. रुपाली पाटील यांनी चाकणकरांवर सडकून टीकादेखील केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी केली. “रुपाली चाकणकर यांचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात राजीनामा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतल्याबद्दल आम्ही त्यांच्या आभारी आहोत. आता चाकणकरांना तात्काळ अटक केली पाहिजे. या रॅकेटच्या शेवटच्या धागापर्यंत पोहोचून या सगळ्यांना शिक्षा होण्यासाठी सर्व गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करुन तातडीने अटक करणं गरजेचं आहे”, अशी भूमिका रुपाली ठोंबरे पाटील यांनी मांडली.

    “महाराष्ट्रातील माता-भगिनींवर जे अन्याय, अत्याचार झाले त्याला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार करण्याबाबत लवकरच निर्णय घेतील. कारण या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. सरकारची बदनामी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायला सांगितला. आता पक्षाच्या अध्यक्षा देखील चाकणकरांचा राजीनामा घेतील. ही मागणी सर्व पदाधिकाऱ्यांची आहे”, असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

    ‘तुमचे काय संबंध होते त्याचे पुरावे देणार’

    “मी आरोप केलेले नाहीत, तर रुपाली चाकणकर यांच्या गुरुने महिलांचा शोषण केलं आहे, तर चाकणकर यांनी या भोंदू बाबाला पदाचा गैरवापर करुन मदत केली. ते मी जगासमोर आणलं आहे. ते मी कोर्टासमोर आणणार आहे. तुम्हाला कोणत्या नोटीस पाठवायच्या आहेत ते पाठवा. मी पुरावे देणार. तुमचे काय संबंध होते त्याचे पुरावे देणार. अशीच धमकी त्यांनी खबरादर पुढारीच्या पत्रकाराला दिली होती ज्यांनी या भोंदू बाबाचा भंडाफोड केला होता. त्याचवेळी ह्यांनी कारवाई केली असती तर आज एवढ्या महिला बळी पडल्या असत्या का?”, असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला.

    ‘तेव्हा कडक कारवाईचे आदेश का दिले नाहीत?’

    “रुपाली चाकणकर यांचा 2016 पासून अशोक खरात हा गुरुमाऊली आहे. त्या 2016 पासून त्यांची छत्री धरतात, पाय धरतात, अजून केक खायला घालतात. आम्हाला अडचण नाही. पण वर्षभरापूर्वी या भोंदू बाबाचा भंडाफोड झाला तेव्हा त्यांनी या भोंदूबाबावर कारवाई का नाही केली? तेव्हा तर तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होता. तेव्हा तु्म्हीला पोलिसांना कडक कारवाईचे आदेश का नाही दिले?”, असादेखील सवाल रुपाली पाटील यांनी केला.

    ‘चाकणकरांनी भोंदू बाबाला वाचवण्यासाठी अडथळे निर्माण केले’

    “रुपाली चाकणकर यांना या सगळ्या गोष्टींची माहिती होती की, त्यांचा गुरु हा भोंदूबाबा हा विकृत चाळे करतो. अत्याचार करतो. हे माहिती असूनसुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मूग गिळून गप्प बसल्या होत्या. पीडितेची बाजू न घेता त्यांनी पोलिसांना पत्र दिले आहेत. गुन्ह्याचा तपास होऊ नये यासाठी दबाव टाकला आहे. रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबाला वाचवण्यासाठी तपासात अडथळे निर्माण केले. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या, कायदा याबद्दल बोलू नये. कोणी बदनामी केली? तुम्हीच बदनाम झाले. पाठवा नोटीस. काय व्हायचं ते होऊ दे”,, अशा शब्दांत रुपाली ठोंबरे पाटील यांनी निशाणा साधला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा