• Fri. Mar 20th, 2026
    11 महिने संसार, वेगळ्या देशात नोकरी, जोडपं पुणे कोर्टात, लग्न जुळवणाऱ्या माऊलींनीच घटस्फोट प्रक्रिया पूर्ण केली

    Pune Couple Divorce : नीरज आणि प्रियांका (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह २८ जून २०२३ रोजी पुण्यातील कोरेगाव पार्कातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. मात्र लग्नाला वर्ष पूर्ण होण्याच्या आतच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ (ब) नुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर त्यासाठी सयुक्तिक कारणे नमूद करून शपथपत्रे जोडून अर्ज करावा लागतो. त्यानंतर घटस्फोट घेण्यासाठी १२ महिने स्वतंत्र राहणे आणि त्यानंतर सहा महिने फेरविचाराचा कालावधी (कूलिंग ऑफ पीरियड) असे १८ महिने वेगळे राहणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात पती-पत्नी दोन वर्षांपासून वेगळे राहत असून, त्यांना आपल्या पसंतीच्या जोडीदारासोबत आयुष्याची नव्याने सुरुवात करता यावी, यासाठी न्यायालयाने ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घटस्फोटाचा अर्जावर शिक्कामोर्तब केले.

    काय आहे प्रकरण?

    सात जन्म एकमेकांसमवेत जगण्याच्या आणाभाका घेऊन राहणाऱ्या जोडप्याचा संसार जेमतेम वर्षभरातच विस्कटला. वेगवेगळ्या देशांत नोकरी करणाऱ्या पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला. त्यांचा विवाह जुळविणाऱ्या आयांनाच ‘मुखत्यारपत्र’ (पॉवर ऑफ ॲटर्नी) घेऊन आपल्या पाल्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पती-पत्नीशी संवाद साधून त्यांचा निर्णय ऐच्छिक असल्याची खातरजमा केली अन् सहा महिन्यांचा फेरविचार कालावधी रद्द करून दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.नीरज आणि प्रियांका (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह २८ जून २०२३ मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्कातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. दोघे परदेशात आयटी कंपनीत उच्चपदावर नोकरी करतात. लग्नानंतर जोडपे अवघे अकरा महिने एकत्र राहिले. मात्र, विचारांमधील तफावत आणि टोकाच्या मतभेदांमुळे सुखी संसाराची स्वप्ने अधुरीच राहिली. लग्नाला वर्ष पूर्ण होण्याच्या आतच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. अपत्य नसल्याने दोघांनी विभक्त राहण्याच्या निर्णयावर कायदेशीर मोहोर उमटविण्याचे ठरविले. त्यासाठी परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज पुणे न्यायालयात दाखल केला. पत्नीच्या वतीने ॲड. रोहित एरंडे, तर पतीतर्फे ॲड. अभिदीप खळदकर यांनी काम पाहिले.
    Maharashtra TimesPune Friends Death : लेह-लडाखहून परत येताना काळाचा घाला, पुण्यातील तीन मित्रांचा अपघाती अंत, विमानाने परतलेला दोस्त धक्क्यात

    आईंनी पूर्ण केली घटस्फोट प्रक्रिया

    पती-पत्नी परदेशात वास्तव्यास असल्याने त्यांना प्रत्येक तारखेला भारतात येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या आयांना मुखत्यारपत्र देऊन घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेचे अधिकार दिले. दोघांचे लग्न जुळविणाऱ्या आयांनी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. पती-पत्नी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर झाले. त्यांनी स्वेच्छेने व परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेत असल्याचे न्यायालयात सांगितले. समुपदेशकाच्या अहवालातही हे जोडपे पुन्हा एकत्र नांदण्याची शक्यता नसल्याचे नमूद होते. पती-पत्नीमध्ये पैशांसह कोणतेही वाद नव्हते. पती-पत्नी दोन वर्षे विभक्त राहात असल्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३-बी अंतर्गत फेरविचारासाठी दिला जाणारा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाने शिथिल केला आणि घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.

    राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष, मनसेचा महायुती सरकारवर निशाणा

    Maharashtra TimesCrime News : प्रेमविवाह झाला, लग्नाच्या खर्चावरुन वाद, सून आईसोबत आली, ठोश्याने सासूबाईंचा दात पाडला, मुलावर गंभीर आरोप

    कसा वगळला जातो कालावधी?

    काही पती-पत्नींमधील नातेसंबंध इतके बिघडलेले असतात की, त्यांनी परत एकत्र येणे अशक्य असते. अशा प्रकरणांत पती-पत्नींना सहा महिन्यांचा फेरविचाराचा कालावधी देऊन उपयोग होत नाही. काही प्रकरणांत पती-पत्नी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विभक्त राहत असतात. विभक्त होण्याच्या अटी-शर्ती निश्चित असतील, तर परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या अर्जावर ‘कूलिंग ऑफ पीरियड’ वगळण्याची विनंती केली जाते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा