• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai Local: मोटरमन स्टेशनच विसरला, ट्रेन वेगाने पुढे, प्रवाशांमध्ये गोंधळ; मुंबई लोकल स्टेशनवरील घटनेची चर्चा

    Mumbai Local: मोटरमन स्टेशनच विसरला, ट्रेन वेगाने पुढे, प्रवाशांमध्ये गोंधळ; मुंबई लोकल स्टेशनवरील घटनेची चर्चा

    Mumbai News: मोटरमन थांबा विसरल्यामुळे लोकलचे दोन डबे फलाटावरील निश्चित थांबा ओलांडून पुढे गेले. लोकल पुढे जाऊन थांबल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

    Mumbai local Train.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: सातत्याने विलंबाने धावणारी मध्य रेल्वेची वातानुकूलित (एसी) लोकल आता निश्चित फलाट थांबा ओलांडल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली कल्याण एसी लोकल मंगळवारी भांडुप स्थानकात पोहोचताना निश्चित थांबा ओलांडून दोन डबे पुढे जाऊन थांबली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

    सीएसएमटी-कल्याण जलद एसी लोकल सकाळी ८.५६ वाजता कल्याण दिशेला रवाना झाली. घाटकोपर ओलांडल्यावर लोकलचा पुढील थांबा भांडुप स्थानकात होता. मोटरमन थांबा विसरल्याने स्थानकात प्रवेश करतानाही लोकल वेगात होती. दरम्यान, अचानक लक्षात आल्याने लोकल थांबवण्यात आली. तोपर्यंत लोकलचे दोन डबे फलाटावरील निश्चित थांबा ओलांडून पुढे गेले होते. लोकल पुढे थांबल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. अखेर फलाटापासून पुढे गेलेल्या डब्यातील प्रवासी अन्य डब्यांतून फलाटावर उतरले. सकाळी कल्याण दिशेला जाणारी लोकल असल्याने कमी गर्दी होती. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

    एसी लोकलच्या मर्यादित लोकल फेऱ्या आहेत. त्यामुळे त्यांचे थांबे देखील मोजक्या स्थानकांवर आहेत. भांडुप स्थानकात थांबे असलेल्या एसी लोकलची संख्या अत्यंत कमी आहे. काही प्रवाशांनी याचे व्हिडीओ काढत समाजमाध्यमांवर पोस्ट केले. मध्य रेल्वेने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

    दरम्यान, मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाल्यापासून प्रवाशांना दिलासा कमी आणि त्रासच अधिक होत आहे. रोजचा विलंब, दरवाजे उघड-बंद होताना येणाऱ्या अडचणी, पूर्वसूचना न देता ऐनवेळी लोकल रद्द होणे, यांमुळे एसी लोकलचे पासधारक प्रवासी त्रासले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा