नाशिकमध्ये टोळीयुद्धाचा भडका उडालेला बघायला मिळाला. हनुमानवाडी येथे सोमवारी रात्रीच्या दहाच्या सुमारास एका टोळीने एका तरुणावर हल्ला केला. यावेळी परिसरातील वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिकच्या हनुमानवाडी येथील श्रीकृष्ण नगर येथील मारुती मंदिर परिसरात 15 मार्चला रात्री उशिरा टवाळखोरांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात टवाळखोरांनी दबा धरून बसत निलेश रणमाळे या युवकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दबा धरून बसलेल्या टोळक्याने परिसरात असलेल्या अनेक गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून दहशत माजवण्याचा यावेळी प्रयत्न केला. यामध्ये अनेक नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक मोठ्या दहशतीखाली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या टोळक्याकडे कोयते, दांडके, दगड तसेच बंदुकीसारखी शस्त्रे देखील असल्याचे दिसून आले. रात्रीच्या सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ‘पाटणकर टोळीकडून ‘ वर्चस्व वादावरुण हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे तत्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.
स्थानिक महिलांची घटनेवर नाराजी
या घटनेवर एका स्थानिक महिलेने प्रतिक्रिया दिली. “आमचा मुलगा कामावरुन येत होता. शोरुमची गाडी फोडून टाकली. आता त्यांच्याकडे बंदूक, तलवारी असतील तर समोरचा माणूस काय करेल? टोळीतील लोकं दुकानात सुद्धा घुसले. त्यांची किती हिंमत आहे? मग रस्त्यानेही चालायचं नाही का? हल्ला करणारे इथले नाहीत. ज्यांच्यावर हल्ला झाले ते आमच्या परिसरातील आहेत. मुलं दमून थकून आल्यावर थोडे बसतात. आम्ही सर्व महिला स्वयंपाक करण्यात होतो. कारण इथे सर्वजण हातावर काम असणारी आहेत. या परिसरात अशी घटना पहिल्यांदा झाली आहे. या घटनेवर कडक कायदा झाला पाहिजे. एखादाचा जीव गेला असता तर काय केलं असतं? परिसरात लहान मुलं आहेत”, अशी तक्रार इथल्या स्थानिक महिलांनी केली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा