• Fri. Mar 20th, 2026
    Dharma Swatantrya Bill : जबरदस्ती धर्मांतर करुन लग्न केलं तर काय कारवाई होणार? मुख्यमंत्र्यांकडून A टू Z माहिती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात आज धर्मस्वातंत्र्य विधेयत सादर केलं. या विधेयकात त्यांनी बेकादेशीर धर्मांतर करुन लग्न झालं आणि नंतर बाळ जन्माला आल्यास काय कारवाई करण्यात येईल? याबाबत महत्त्वाची माहिती दिली. तसेच त्या बालकाला नेमके काय अधिकार असतील? याबाबतही सविस्तर सांगितलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत धर्मांतर विरोधी विधेयक म्हणजेच धर्मस्वातंत्र्य विधेयक सादर केलं. यावेळी त्यांनी कायद्यातील अनेक तांत्रिक मुद्द्यांवर भाष्य केलं. “कुठला धर्म अवलंब करायचे आहे त्याचे अधिकार हे आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले आहेत. पण हे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट सांगितली आहे की, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अवलंब करण्याचा अधिकार असला तरी हा अधिकार काही रिस्ट्रीक्शनला अनुलक्षून देण्यात आलेला आहे. जोरजबरदस्ती करुन, आमिष देवून किंवा धमकी देवून धर्मांतर केलं जावू नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या स्तरावर पूर्वी या संदर्भात कायदा तयार करावा असा विषय आला होता. त्यानंतर त्या काळात केंद्र सरकारने सांगितलं की हे राज्याच्या अख्यत्यारित हा विषय होतो. त्यामुळे राज्यांना हा निर्णय घेतला पाहिजे. वेगवेगळ्या राज्यांनी 1968 पासून याबाबत निर्णय घेतले आहेत. त्यामुळे हा कायदा आज होतोय असं नाहीय”, अस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

    “बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे. त्यामुळे कुणी धर्मांतर करु नये याकरता हे विधेयक नाही. तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमतून होणारं धर्मांतर यापासून नागरिकांचं संरक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक आणलं आहे. धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात नेण्यासंदर्भात हे प्रतिबंधित करतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
    Maharashtra TimesDevendra Fadnavis : स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर काय करावं? देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सर्व स्टेप्स सांगितल्या
    “ज्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, फसवणूक असेल, बळजबरी, लबाडी किंवा अल्पवयीन धर्मांतर असेल, गैरवाजवी प्रभाव असेल अशा धर्मांतराला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलं आहे. या पद्धतीने केलेलं कोणतंही धर्मांतर हे बेकायदा धर्मांतर होणार आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

    बेकायदेशीर धर्मांतर, लग्न अन् मग बाळाचा जन्म, फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

    “या कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन करुन एखाद्याचं धर्मांतर केलं असेल तर धर्मांतर करणारी व्यक्ती किंवा संस्था हे शिक्षेस पात्र असतील. अशा पद्धतीने झालेलं धर्मांतर हे निरर्थक होईल. बेकायदेशीर धर्मांतर होऊन लग्न होतो. लग्न झाल्यानंतर विच्छेद होतो. त्यानंतर काय करायचं? याबाबत या कायद्यात तरतूद केलेली आहे. केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी केलेला कुठलाही विवाह न्यायालयाद्वारे शुन्यवत किंवा निरर्थक असल्याचे घोषित करण्यात येईल. हे न्यायालय घोषित करेल. बेकायदेशीर धर्मांतरामुळे एखादा बालक जन्माला येत असेल तर त्या बालकाला कोणत्या जातीचं धर्माचं मानण्यात यावं? तर बालकाची आई ज्या पूर्वाश्रमीच्या धर्माची होती तोच त्या मुलाचा धर्म मानण्यात येईल. तथापि, आई आणि वडिलांच्या मालमत्तेत उत्तराधिकार मिळवण्याचा हक्का त्या बालकाचा कायम असेल. भारतीय नागरीक संहिता कलम 144 च्या तरतुदीनुसार मेंटेनन्सकरता ते हकदार असतील. त्यासोबतच बाळाची कस्टडी आईकडे असेल”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा