मुंबई
मुंबईकरांना शनिवारीही उष्ण झळांची जाणीव झाली. मात्र शुक्रवारपेक्षा कमाल तापमानाचा पारा सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर खाली आला होता. येत्या आठवड्यात मुंबईमध्ये ३३ अंशांदरम्यान कमाल तापमान नोंदले जाईल, अशी शक्यता आहे. अरबी समुद्र आणि विदर्भाजवळ प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. सह्याद्रीच्या पलीकडे वारा खंडितता प्रणाली निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण झाली असून, याचा परिणाम कोकणातील उष्णता कमी होण्यावरही होण्याचा अंदाज आहे.
उत्तर कोकणामध्ये रविवार ते बुधवार या कालावधीत वातावरण कोरडे असू शकेल. सोमवार, १६ मार्चला सिंधुदुर्गात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर येथेही सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे, तर पुणे जिल्ह्यात रविवार ते मंगळवार या कालावधीत हलक्या सरींचा अंदाज आहे. कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर येथे सोमवारी, सातारा, सांगली, घाट परिसर येथे रविवार, सोमवारी, सोलापूर येथे रविवार ते बुधवार या कालावधीत ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात बीड येथे रविवारी, सोमवारी, परभणी येथे सोमवार ते बुधवार, हिंगोली, नांदेड येथे मंगळवार आणि बुधवारी तर लातूर, धाराशिव येथे रविवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांना या दिवसांसाठी ‘यलो अॅलर्ट’ आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना रविवारपासून, गोंदिया, यवतमाळला सोमवारपासून ‘यलो अॅलर्ट’ आहे, तर अकोला आणि अमरावतीमध्ये रविवारीही तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.