मुंबई–अनुप फंड
मुंबईतील विधानभवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढले. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आत येण्यास मनाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, एकीकडे इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेचा संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईतील विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन हे महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जातो. यावर चर्चाही होते. आता काही वेळात चर्चेला सुरुवात होणार होती. त्यापूर्वीच ई-मेलद्वारे विधानभवन उडवून देऊ अशी धमकी भल्या पहाटे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाली आहे. तसेच पोलीसही सक्रीय झाले आहेत. या संपूर्ण परिसरातून नागरिक, इथे काम करणारे कर्मचारी त्यांना बाहेर काढले जात आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवा, विधानसभा अध्यक्षांचे आदेश
तसेच प्रत्येक केबिनची चेकींग केली जात आहे. कुठे काही संशयास्पद गोष्टी आढळतात का, याची झाडाझडती घेतली जात आहे. तसेच जे लोक बाहेरुन येतात, त्यांचेही पास बंद केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्ष यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवा, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.
त्यासोबत बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच डॉग स्कॉड पथकालाही बोलवण्यात आले आहे. या संपूर्ण परिसराची सध्या तपासणी केली जात आहे. या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आढळतात का, याचीही पाहणी केली जाणार आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. दक्षता घेऊन सध्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
