साताऱ्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्ससा अजूनही संपलेला नाही. इथे कुणाला बहुमत मिळालेलं नाही. तसेच महायुतीमधील पक्षांना मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर तसं करता येणं शक्य आहे. पण घडामोडी काहीतरी वेगळ्याच घडताना दिसत आहेत.
सातारा जिल्हा परिषदेत भाजप २७, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिंदेंची शिवसेनेला १५, काँग्रेस १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ आणि १ अपक्ष, असे चित्र निकालात समोर आले. कोणत्याही पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. वरीलपैकी बंडखोर अपक्ष महिला उमेदवाराने भाजपला तर काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं पारडं जड आहे.
महायुतीतील तीनही पक्ष आणि विरोधक देखील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रचारात करत होते. मात्र निकालात समोर आलेले बलाबल पाहून भाजपचा भ्रमनिरास झाला. तरीही मंत्री गोरे यांनी सातारा झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचे वक्तव्य तीन वेळा केले आहे.
सातारा झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच करण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांचे जोरदार प्रयत्न सुरू असताना कराड पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून भाजपमध्येच संघर्ष सुरू झाला आहे. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार झाली असल्याचे समजते. कराड उत्तरमधील उमेदवाराला सभापती करण्यासाठी भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी डाव टाकला आहे. त्यांच्या या पवित्र्याने कराड दक्षिणमधील भाजपचे आमदार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची कोंडी झाली असून कराड तालुक्यातील पहिली महिला झेडपी अध्यक्षा करण्याच्या प्रयत्नांना देखील खीळ बसली आहे.
भाजप अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मौन बाळगले आहे. या सर्व घडामोडी पाहता कराड पंचायत समितीची सभापती निवडच सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरविणार असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. कराड तालुक्यातील दक्षिण आणि उत्तरमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पैरा पाहता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती निवडीत काहीही घडू शकते, असे सध्या चित्र आहे.
