• Sun. Jun 14th, 2026
    राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात
    मुंबई 
    राज्याचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. राजकीय कारकीर्दीत देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी वित्त खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभाची रक्कम १५०० वरून २१०० होणार का, तसेच सरकारच्या इतर योजनांना किती निधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले होते. निवडणुकीआधी २०२४मध्ये मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीनंतर हा लाभ १५००वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र , निवडणुकीनंतरच्या अर्थसंकल्पात हप्त्यात वाढ करण्यात आली नव्हती. आता शुक्रवारी मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात याविषय़ी काही घोषणा होते का, याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष असणार आहे.लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक शिस्त अधिक काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्या योजनांच्या निधीला कात्री लागणार,

    तसेच कोणत्या योजना बासनात गुंडाळणार, याकडेही लक्ष असणार आहे.महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याविषयी या अर्थसंकल्पात काय घोषणा होते, हेही पाहावे लागणार आहे. पायाभूत सुविधा, सिंचनाची कामे यावर आगामी आर्थिक वर्षासाठी किती निधी राखून ठेवण्यात येतो, याकडे लक्ष लागून राहिले आहे. दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

    कर्जाचा बोजा वाढणार
    विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात राज्यावरील कर्जाचा आकडा मार्चअखेरीस ९ लाख ३२ हजार कोटींवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महसुली जमेपेक्षा खर्च अधिक असल्याने महसुली तूट अपेक्षित आहे. राज्याच्या कर्जात गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रमी वाढ अपेक्षित असून मार्च २०२६ अखेर राज्यावरील कर्जाचा बोजा ९ लाख ३२ हजार २४२ हजार कोटीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी मार्च, २०२५ अखेर कर्जाचा आकडा ८ लाख ३९ हजार २७५ कोटी रुपये इतका होता. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्ज तब्बल ९२ हजार ९६७कोटींनी वाढणार आहे. राज्याचे कर्ज स्थूल राज्य उत्पन्नाच्या १७ते १८ टक्के मर्यादेत कायम राहिल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट २.७ टक्के, महसुली तूट ०.९ टक्के तर कर्जाचे राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण १८.३ टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed