टी20 वर्ल्ड कप 2026 मधील दुसरा सेमीफायनल सामना आज होईल. भारत आणि इंग्लंडच्या टीममधील विजेता फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. या मॅचआधी इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने एक स्टेटमेंट दिलं आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनल मॅचआधी सॅम करनने टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माचं नाव घेतलं. त्याच्यापासून सर्तक राहिलं पाहिजे असं सॅम म्हणाला. या हाय-वोल्टेज सामन्याची आज सगळीकडे चर्चा आहे. फायनलमध्ये पोहोचण्याची दोन्ही टीम्सकडे चांगली संधी आहे. अभिषेक पासून असलेल्या धोक्याची आम्हाला कल्पना आहे. तो आज काही धमाकेदार इनिंग खेळणार नाही अशी अपेक्षा आहे असं सॅम करन म्हणाला.
अभिषेक शर्माला इंग्लंडची टीम अजिबात विसरणार नाही. कारण इंग्लंड विरुद्ध शेवटच्या टी20 सामन्यात वानखेडेवरच तो 54 चेंडूत 135 धावांची स्फोटक इनिंग खेळला होता. यात 13 सिक्स आणि 7 फोर होते. त्या सामन्यात भारताने इंग्लंडला 150 धावांनी हरवलं होतं. इंग्लंडसाठी टी20 इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव होता. “अभिषेक पुन्हा आज अशी इनिंग खेळणार नाही अशी अपेक्षा आहे. पण आम्ही या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमचं लक्ष गुरुवारच्या रात्रीवर आहे” असं सॅम करन प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला.
स्फोटक फलंदाजीने कधीही मॅचची दिशा बदलू शकतो
चालू टुर्नामेंटमध्ये अभिषेक शर्मा काही खास प्रदर्शन करु शकलेला नाही. त्याने सहा सामन्यात फक्त 80 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध त्याने 30 चेंडूत 55 धावा ही एकमेव अर्धशतकी इनिंग खेळला. सुरुवातीच्या तीन सामन्यात तो शुन्यावर आऊट झाला. त्या शिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 चेंडूत 15 धावा आणि वेस्ट इंडिज विरुद्ध 11 चेंडूत 10 धावा केल्या. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये नाहीय, तरीही इंग्लंडच्या मनात त्याची भिती आहे. कारण तो त्याच्या स्फोटक फलंदाजीने कधीही मॅचची दिशा बदलू शकतो.
इंग्लिश टीमवर दबाव जास्त असेल
भारत आणि इंग्लंडची टीम सलग तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. याआधी दोघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. ICC च्या नॉक आउट सामन्यात दोन्ही टीम्स सहाव्यांदा आमने-सामने येतील. मागच्या पाच सामन्यात तीन विजयासह टीम इंडिया आघाडीवर आहे. टीम इंडिया यावेळी आपल्या घरात खेळत आहे. त्यामुळे इंग्लिश टीमवर दबाव जास्त असेल. टीम इंडियाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
