रिसोड येथील भगवान निर्बान, त्यांची पत्नी पदमाबाई निर्बान, मुलगा पवन निर्बान आणि सून नंदा निर्बान हे २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथून दुबईला पर्यटनासाठी गेले होते. पाच दिवसांचा दौरा पूर्ण करून २८ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथून पुण्याकडे परतण्याचे त्यांचे तिकीट आरक्षित होते. मात्र अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे विमानतळावरील उड्डाण सेवा स्थगित करण्यात आली आणि त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.
रिसोड येथील निर्बान कुटुंबिय; वृद्ध आई वडील, भाऊ वाहिनी दुबईत अडकल्यामुळं चिंतेत असून लवकरात लवकर भारतात आणण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे.
आखाती देशात मराठवाड्यातीलही ३४ प्रवासी अडकले
मध्यपूर्वेत इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेत युद्ध भडकले आहे. या युद्धाने आखाती देशातील जवळपास सहा ते सात देश युद्धाच्या सावटाखाली आले आहेत. या युद्धामुळे आखाती देशात गेलेले भारतातील अनेक पर्यटक, प्रवासी अडकले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर येथील तिघांसह मराठवाड्यातील ३४ जणांचा समावेश आहेत. सर्व भारतीय नागरिक सुखरूप असून त्यांच्या परतण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्त्रायल या देशात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाने आखाती देशातील युएई, कतार, बहरीन यासह इतर देशांच्या हवाई सीमा बंद करण्यात आल्या आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतातून या देशांमध्ये गेलेले प्रवासी अडकून पडले आहेत. विशेषतः दुबईत अडकलेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाड्यातील ३४ प्रवासी मध्य पुर्वेतील देशात अडकले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
दरम्यान, मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.