• Fri. Mar 6th, 2026

    Maharashtra Police: पोलिसांना मिळणार सुट्टी न घेण्याचे ‘फळ’; शिल्लक राहणाऱ्या सुट्ट्यांची मर्यादा तीनशेवरुन सहाशेपर्यंत वाढणार

    Maharashtra Police: पोलिसांना मिळणार सुट्टी न घेण्याचे ‘फळ’; शिल्लक राहणाऱ्या सुट्ट्यांची मर्यादा तीनशेवरुन सहाशेपर्यंत वाढणार

    Maharashtra Police: महासंचालक कार्यालयाकडून तयार करण्यात येणाऱ्या या प्रस्तावासाठी आवश्यक असलेली माहिती मुंबईसह राज्यातील इतर पोलिसांकडून मागविण्यात आली आहे.

    महाराष्ट्र पोलिस दल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    दीपेश मोरे, मुंबई : सततचा बंदोबस्त, अपुऱ्या मनुष्यबळामुळे येणारा कामाचा ताण यामुळे अनेकदा इच्छा असूनही पोलिसांना सुट्ट्या घेता येत नाहीत. सेवानिवृत्तीला तीनशेपेक्षा अधिक सुट्ट्या शिल्लक राहिल्यास त्या वाया जातात. आता मात्र सुट्ट्या न घेता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना ‘फळ’ मिळणार आहे.

    आर्थिक मोबदला मिळणाऱ्या सुट्ट्यांची मर्यादा तीनशेवरून सहाशे करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यानुसार पोलिसांना शिल्लक राहिलेल्या सहाशे सुट्ट्यांचे पैसे मिळणार आहेत. यासाठी राज्य पोलिस मुख्यालयातून सर्व पोलिसांकडून माहिती मागविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

    Maharashtra TimesHoli 2026: मुंबईकरांनो, होळी खेळा, पण शिस्तीत! पोलिसांची मार्गदर्शक सूचना, नियम मोडल्यास थेट कारवाई
    पोलिस दल अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांना सुट्ट्यांचा अभाव असतो. तसे पाहायला गेल्यास आजारपणाची, किरकोळ, अर्जित अशा सुमारे ९० ते ९५ रजा पोलिसांना वर्षभरात असतात. मात्र बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, कोर्टकचेऱ्या आणि त्यातच मंजूर पदांइतके मनुष्यबळ नसल्याने पोलिसांना या सुट्ट्या घेता येत नाहीत. ३० ते ४० वर्षे पोलिस दलामध्ये सेवा बजावल्यानंतर तीनशेपेक्षा अधिक सुट्ट्या शिल्लक असल्यास त्या वाया जातात. तीनशे सुट्ट्यांचे पैसेच पोलिसांना मिळतात. यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शिल्लक रजांची मर्यादा सहाशे करण्याचा विचार आहे. यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

    Maharashtra TimesMumbai Crime: आठवीतील विद्यार्थ्याची तलावात बॉडी; पोहताना बुडाल्याचा संशय, पण सत्य काही वेगळंच, तीन मित्र अटकेत
    गेल्या वर्षभरात निवृत्त झालेल्या पोलिसांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. वर्षभरात निवृत्त झालेल्या पोलिसांपैकी किती पोलिसांनी तीनशेची मर्यादा ओलांडली होती, तसेच इतर तपशील मागविण्यात आला आहे. राज्यभरातून मिळालेल्या तपशिलांच्या आधारे प्रस्ताव तयार करून शासनदरबारी पाठविण्यात येणार आहे. कर्तव्याला प्राधान्य देत सुट्ट्या न घेणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचे यामुळे आर्थिक नुकसान टळणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.