• Sun. Mar 8th, 2026

    Anna Hazare: अरविंद केजरीवाल, सिसोदिया यांना न्यायालयाचा दिलासा; आधी टीका करणाऱ्या अण्णा हजारेंनी आता दिला कानमंत्र

    Anna Hazare: अरविंद केजरीवाल, सिसोदिया यांना न्यायालयाचा दिलासा; आधी टीका करणाऱ्या अण्णा हजारेंनी आता दिला कानमंत्र

    Arvind Kejriwal: ‘केजरीवाल आणि सिसोदिया दोघेही आपलेच कार्यकर्ते आहेत. त्यांनी समाज आणि देशाच्या हिताचे काम करीत राहावं,’ असं अण्णा हजारे म्हणाले.

    अरविंद केजरीवाल, सिसोदिया यांना न्यायालयाचा दिलासा; आधी टीका करणाऱ्या अण्णा हजारेंनी आता दिला कानमंत्र(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज न्यायालयाने मोठा दिलासा देत कथित मद्य घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणावरून प्रतक्रिया देत केजरीवाल आणि सिसोदिया यांनी आपले देशहिताचे काम करत राहावं, असं म्हटलं आहे.

    ‘दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आमचेच कार्यकर्ते आहेत. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक झाल्यावर त्यावेळी मी जे बोललो त्यावेळी न्यायालयाचा निर्णय आला नव्हता. न्यायालयाचा निर्णय असता, तर मी असे बोललो नसतो. न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

    मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी केजरीवाल यांना अटक झाली त्यावेळी अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. आता केजरीवाल आणि सिसोदिया यांची न्यायालयातून निर्दोष सुटका झाली आहे. यासंबंधी प्रसारमाध्यामांनी विचारले असता हजारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंबंधी विचारले असता हजारे म्हणाले, ‘लोकांची मागणी असेल तर सरकारने चौकशी केली पाहिजे. लोकांच्या भावना सरकारने विचारात घेतल्या पाहिजेत. मात्र, जी गोष्ट डोळ्याने पाहिली नाही, ऐकलीही नाही, त्यावर माझे वैयक्तिक काहीच मत नाही. त्यावर मी काही बोलू शकत नाही.’

    केजरीवाल काय म्हणाले?

    न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आज अश्रू अनावर झाले. “आमच्याविरोधात संपूर्ण खोटी केस तयार करण्यात आली. ‘आप’ला संपवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या दोघांनी सर्वांत मोठं राजकीय षडयंत्र रचलं. आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. भारताच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं ते घलं. मला सहा महिने आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना दोन वर्षे तुरुंगात ठेवलं, पण आम्ही इमानदार असल्याचं आता कोर्टाने सांगितलं आहे,” अशा भावना केजरीवाल यांनी व्यक्त केल्या.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा