Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान सोमवार, १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोअर कमिटीच्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
भाजप निष्ठावंतांना न्याय देणार?
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सातपैकी चार जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. यातील एक जागा भाजपकडून पुन्हा एकदा रामदास आठवले यांना सोडली जाण्याची शक्यता आहे. तर इतर तीन जागांसाठी मोठी रस्सीखेंच असल्याचं दिसत आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच तावडे यांच्यासह विजया राहटकर आणि धैर्यशील पाटील यांचीही नावे स्पर्धेत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या सदस्यांची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ५ मार्च २०२६ असा आहे. या अर्जांची छाननी शुक्रवार, ६ मार्च रोजी करण्यात येईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख ९ मार्च आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि निवडणुकीचा निकाल काय लागतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
