• Sat. Mar 7th, 2026

    रायगड-पुणे प्रवासात वेळ वाचणार? ताम्हिणी घाटासाठी दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित; 30 ते 50 किमी अंतर होणार कमी

    रायगड-पुणे प्रवासात वेळ वाचणार? ताम्हिणी घाटासाठी दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित; 30 ते 50 किमी अंतर होणार कमी

    Tamhini Ghat: रायगडमधील दिघी बंदर ते पुणे जिल्ह्यापर्यंत अंतर कमी होणार असल्याची शक्यता आहे. सध्याच्या ताम्हिणी घाटाला दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित आहेत. या मार्गांमुळे अंतर 30 ते 50 किमी कमी होणार आहे.

    वैभव भोळे, अलिबाग: रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिघी बंदराचे काम जोरात सुरू आहे. हे बंदर आता विस्तृत व्यावसायिक आणि लॉजिस्टिक हबमध्ये रूपांतरित होणार आहे. या बंदराला पुण्याशी जोडणारा सध्याचा ताम्हिणी घाट हा एक मार्ग आहे. मात्र हे अंतर कमी करण्यासाठी पर्यायी दोन मार्ग प्रस्तावित आहेत. या दोन पर्यायी मार्गांमुळे आताच्या अंतरात सुमारे ३० ते ५० किमी अंतराची तसेच, पैशांची बचत होऊन वेळ वाचणार आहे. मात्र या मार्गावरील काही भाग रायगड तर, काही भाग पुणे जिल्ह्यात येत असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील समन्वयाच्या अभावामुळे पर्यायी मार्गाचे घोंगडे भिजत पडले आहे.

    ताम्हिणी घाटामुळे अनेक जिल्हे जवळ

    ताम्हिणी घाटमार्ग सुरू झाल्यामुळे दक्षिण रायगडसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण सुलभ झाले. पुढे या मार्गाचे रुंदीकरण करून औरंगाबाद-नगर-पुणे-पौड-विळे हा संपूर्ण मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. यामुळे रायगड, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जळगाव हे जिल्हे जवळ आले.Maharashtra TimesSantacruz-Chembur Link Road: लिंक रोडची 12 वर्षांतच दुरवस्था; सीएसएमटी, एलबीएस, टिळकनगर मार्गावरील पुलांना गंज, गर्डरला तडे

    टाटा या मार्गावरील पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात मुळशी-वाघेवाडी-ताम्हिणी येथे पूल उभारणे आणि डोंगरवाडी ते ताम्हिणीदरम्यान बोगदा मार्ग केल्यास सध्याचे दिघी-पुणे अंतर सुमारे ३० किमीने कमी होऊ शकते. तर, दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे माणगाव-कुंभे-कुंभ्याची वाडी-घोळ-पानशेत-पुणे हा मार्ग असू शकतो.

    घाटावरील वाहतुकीचा ताण कमी होणार

    सध्या माणगाव तालुक्यात कुंभे धरणाचे काम प्रगतिपथावर असून माणगाव ते कुंभेपर्यंत रस्ता तयार झाला आहे. डोंगराखालून बोगदाही खणण्यात आला आहे. कुंभे ते कुंभ्याची वाडीपर्यंत रस्ता अस्तित्वात आहे. तथापि पुढे घोळपर्यंत सुमारे सात किमी रस्ता अपूर्णावस्थेत आहे. त्यापैकी ४ किमी रायगड जिल्ह्यात तर, तीन किमीचा मार्ग पुणे जिल्ह्यात येतो. मात्र या दोन जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी हे काम रखडले असल्याचे सांगण्यात येते. माणगाव कुंभेमार्गे पानशेत रस्ता प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास दिघी माणगाव-पुणे अंतर सुमारे ५० किमीने कमी होणार आहे. तसे झाल्यास आताच्या ताम्हिणी घाटामधील दिवसेंदिवस वाढत असलेला वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे.

    Maharashtra TimesD.N Nagar-Mandale Metro: ‘मेट्रो 2B’ मुंबई पूर्व-पश्चिम जोडणार, कुर्ल्यातील ‘यू-गर्डर’चं काम फत्ते; कशी असेल मार्गिका?

    पर्यायी मार्गाची तीव्र आवश्यकता

    पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासाठी दिघी बंदर महत्त्वाचे ठरणार आहे. रायगडमधील श्रीवर्धन तसेच महाड, रायगडसह कोकणात पर्यटन व्यवसाय वाढत आहे. राज्याच्या उत्तर व पश्चिम भागातील पर्यटकांना ताम्हिणी घाट सोयीचा आहे. यामुळे ताम्हिणी घाटात सुट्टीच्या दिवशी वाहतूककोंडी होते. काही वेळा वाहनाच्या रांगा लागतात. भविष्यात दिघी बंदरातील दळणवळण वाढणार आहे. नवीन मार्गामुळे दक्षिण कोकणाकडे जाणारा कमी अंतराचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच कुंभपरिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो. याकरिता ताम्हिणी घाटाला पर्यायी मार्गाची अधिक तीव्र आवश्यकता आहे. या रस्ते प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा