• Wed. Mar 11th, 2026

    Kolhapur Acccident : आईची तब्येत बघायला जाताना काळाची झडप, धोकादायक वळणार ट्रकची धडक; चिमुकलीसह आई-वडिलांचा करुण अंत

    Kolhapur Acccident : आईची तब्येत बघायला जाताना काळाची झडप, धोकादायक वळणार ट्रकची धडक; चिमुकलीसह आई-वडिलांचा करुण अंत

    Kolhapur Accident News : कोल्हापूरात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्रिकोणी कुटुंबाचा करुण अंत झाला आहे.

    कोल्हापूर अपघात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर अलखनूर फाट्याजवळ बुधवारी दुपारी झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात जयसिंगपूरच्या शाहूनगर परिसरातील दाम्पत्यासह त्यांच्या सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. गिर्याप्पा हणमंत कुद्रोळी (वय 38), पत्नी मंजूळा (वय 28) आणि मुलगी आराध्या (वय 7 वर्ष) असं मृतांची नावं आहेत. या घटनेमुळे जमखंडी आणि जयसिंगपूरमध्ये शोककळा पसरली असून हारुगिरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

    आईची तब्येत बघण्यासाठी निघाले

    कुद्रोळी कुटुंब हे जयसिंगपूरहून जमखंडीकडे (जि. बागलकोट) आजारी आईची तब्येत पाहण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी रायबाग तालुक्यातील अलखनूर गावाजवळ करिसिद्धेश्वर देवस्थानाच्या धोकादायक वळणावर हा अपघात झाला. जमखंडीतून मिरजकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात मंजूळा आणि आराध्या यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी गिर्याप्पा यांनी स्थानिक नागरिक हारुगिरी येथील खासगी रुग्णालयाकडे नेताना वाटेतच प्राण सोडले.
    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अंगणात खेळणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संध्याकाळी ताप आल्यानंतर…

    लेकीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

    अपघाताची तीव्रता इतकी होती की, धडकेनंतर मंजूळा सुमारे 10 फूट दूरवर फेकल्या गेल्या, तर चिमुकली आराध्या ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. ट्रक चालकाने घटनास्थळाहून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या मार्गावर वळण आणि वाढता वाहतूक भार यामुळे वारंवार अपघात होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.घटनेची माहिती मिळताच हारूगेरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धावले. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले गेले आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघाताची नोंद हारुगिरी पोलिसांत झाली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून वाहतूक पोलिसांना मार्गातील वळण सुधारण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.
    Maharashtra TimesAhilyanagar Accident : लहानपणापासून सोबत, एकाच ताटात जेवण, भीषण अपघातात दोघांचा करुण अंत; थरारक अपघात CCTVमध्ये कैद

    घरी ठेवलेली दोन मुले अनाथ

    कुटुंबातील इतर दोन मुले शाळेमुळे घरीच ठेवली होती. त्यापैकी प्रीतम हा सातवीत शिकणारा आणि किशन हा दहावीत शिकणारा आहे. आता आई-वडिलांच्या प्रेमापासून परावृत्त झालेल्या या भावंडांना शेजाऱ्यांकडून आधार मिळत आहे. गिर्याप्पा जयसिंगपूरच्या खासगी संस्थेत नोकरीला होते, तर मंजूळा दुकानात काम करत होती. मूळचे जमखंडीकर असलेले हे कुटुंब शाहूनगरात वास्तव्य करत होते.

    या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षाविषयक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. स्थानिक नागरिकांनी वळणावर वेग मर्यादेचे सूचनफलक उभारण्याची मागणी केली आहे. तर कुटुंबाच्या नुकसानीने परिसरात दुःखाची लाट उसळली असून नातेवाईक शोकाकुल झाले आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा