Maharashtra Politics: भिवंडी महापालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपच्या २२ पैकी ९ नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे समीकरणं बदलली आहेत.
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नाही. काँग्रेसला सर्वाधिक ३० जागा मिळाल्या. भाजपनं २२ जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी १२ जागांवर समाधान मानावं लागलं. भिवंडी महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या ९० आहे. बहुमतासाठी ४६ चा आकडा गाठणं गरजेचं आहे. भाजपच्या ९ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानं काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ५० च्या पुढे गेलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शप यांचा एकत्रित आकडा ४२ पर्यंत पोहोचला. त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी ४ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. त्यातच आता भाजपच्या २२ पैकी ९ नगरसेवकांनी काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रणित आघाडीनं बहुमताचा आकडा गाठला आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा महापौर बसेल, अशी शक्यता आहे.
गेल्या महिन्याभरापासून भिवंडीत विवि राजकीय समीकरणांची चर्चा होती. भाजप, शिंदेसेना यांचं एकत्रित संख्याबळ ३४ पर्यंत पोहोचतं. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी १२ जणांचा पाठिंबा गरजेचा होता. पण काँग्रेस आघाडीनं भाजपला धक्का दिला. भाजपच्या ९ नगरसेवकांनी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेस आघाडीनं बहुमताचा आकडा गाठला आणि भाजपला जोरदार धक्का बसला.
भिवंडी महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप- २२
शिंदेसेना- १२
ठाकरेसेना- ०
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार- १२
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार- ०
काँग्रेस- ३०
अन्य पक्ष- १३
अपक्ष- १
