छत्रपती संभाजीनगर महापालिकेत १६ हजार संशयास्पद जन्म दाखल्यांचा खळबळजनक घोटाळा उघडकीस आला आहे. हा केवळ गोंधळ नसून देशाच्या सुरक्षेचा विषय असल्याचे सांगत किरीट सोमय्यांनी प्रशासनावर तोफ डागली आहे.
महानगरपालिकेत १६ हजार संशयास्पद नावांची नोंद
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जुन्या रेकॉर्डमध्ये तब्बल १६ हजार नवीन नावे वाढवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेत यापूर्वीच ७०० संशयास्पद जन्म प्रमाणपत्रे दिली गेल्याचा आरोप असून, त्यासंदर्भात महिनाभरात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात २०० लोकांची नावे आरोपी म्हणून समोर आली असून, महापौरांनी या संपूर्ण रेकॉर्डच्या सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारची बोगस नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे झाली आहे, त्या सर्वांची तपासणी आता कडकपणे केली जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
जिल्ह्यातील गावांमधील लोकसंख्या आणि नोंदणीचा मोठा घोटाळा…
संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. एका गावाची अधिकृत लोकसंख्या १३०० असताना मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या काळात तब्बल ३४४७ नवीन जन्मांची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नोंदींमधील एकही नाव स्थानिक रहिवाशाचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असाच प्रकार यवतमाळमध्येही उघडकीस आला होता, जिथे १४०० लोकसंख्या असलेल्या गावात २७ हजार नोंदणी आढळल्या होत्या. सिल्लोडमध्ये देखील अकराशे अपात्र आणि बेकायदेशीर प्रमाणपत्रे दिली गेली असून, या प्रकरणाला गती देण्यासाठी महापौरांनी आता दर महिन्याला आढावा बैठक घेण्याचे ठरवले आहे.
Crime News: ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या…’; भररस्त्यात विवाहित महिलेला शरीर संबंधांची मागणी; संतापजनक घटनेनंतर दोघांवर गुन्हा दाखल
देशाची सुरक्षा आणि घुसखोरांविरुद्ध कठोर भूमिका….
जन्म प्रमाणपत्र हा देशाच्या सुरक्षेचा पाया असून, ज्यांचा जन्म येथे झाला नाही अशांना खोटे दाखले देऊन नागरिकत्व मिळवून देणे हे धोक्याचे आहे. ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत, मग तो बांगलादेशी असो किंवा रोहिंग्या, अशांना शोधून काढून परत पाठवले जाईल असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. महापालिका स्तरावर या प्रकरणाच्या देखरेखीसाठी भाजपच्या तीन वरिष्ठ नगरसेवकांची विशेष टीम बनवली जाणार असून ती संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे.
टिपू सुलतान आणि राष्ट्रीयत्वावरून विरोधकांवर टीका…
निवडणूक जिंकली म्हणून कोणालाही भारताची घटना किंवा राष्ट्रीयत्वाची टिंगल करण्याचा अधिकार मिळत नाही, अशा शब्दांत सोमय्या यांनी विरोधकांचा समाचार घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसारच सर्वांना वागावे लागेल. छत्रपती शिवरायांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. काही महानगरपालिकांमध्ये आपल्या मनाला वाटेल तशी बोगस प्रमाणपत्रे वाटण्याचे काम सुरू आहे, मात्र टिपू सुलतानची प्रतिमा आणि विचार या मातीत मान्य होऊ शकत नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
