Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे शपचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची इच्छा होती, असा आशयाचा लेख शशिकांत शिंदे यांनी लिहिला आहे. तो लेख मी वाचला. याबद्दलचा निर्णय आमच्या नेत्या सुनेत्रा पवार, पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. सुनेत्रा पवार आमच्या पक्षाच्या विधिमंडळातील नेत्या आहेत. त्याच उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे वरिष्ठांसह चर्चा करुन त्या याबद्दलचा निर्णय घेतील. ज्यावेळी एखादा पक्ष आघाडीत येत असतो, त्यावेळी त्या आघाडीचं नेतृत्त्व करत असलेल्या मुख्य पक्षालादेखील विश्वासात घ्यावं लागतं. आम्ही आता एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमधील प्रमुख पक्ष भाजप आहे, असं तटकरे म्हणाले.
शशिकांत शिंदे यांचा लेख मी वाचला. त्यातील एका वाक्यावर मला आक्षेप असल्याचं तटकरेंनी सांगितलं. ‘अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोटेनाटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांना वेगळा गट स्थापन करावा लागला. त्याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते,’ असं शिंदे यांनी लेखात नमूद केलं आहे. अजितदादा चूक दुरुस्त करणार होते, या वाक्यावर मला आक्षेप आहे, असं तटकरेंनी सांगितलं.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर शशिकांत शिंदे यांनी त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं लिखाण करणं गैर असल्याचं म्हणताना भाजप सोबत जाण्याची भूमिका दादांनी खूप आधीपासूनच घेतली होती, ही बाब तटकरेंनी ठासून सांगितली. २०१४, २०१६-१७, २०१९ मध्ये कालावधीत याबद्दलच चर्चा, बैठका झाल्या. मी प्रदेशाध्यक्ष असतानाही याबद्दल आम्ही बोललो होतो. २०१९ मध्येही दादांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका मांडली होती. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यास राज्याला स्थिर सरकार देऊ शकतात. केंद्राकडूनही राज्य सरकारला मदत मिळू शकते, अशी भूमिका वरिष्ठ पातळीवर दादा सातत्यानं मांडत होते. याच भूमिकेतून त्यांनी २०२३ मध्ये भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची आठवण तटकरेंनी करुन दिली.
