वाशिम
राज्यामध्ये रोज गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. खळबळजनक घडामोडींनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा समोर येते आहे. दरम्यान, आता वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका २० वर्षीय तरुणाने ३९ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वाशिम शहर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत राजू तुळशीराम कांबळे वय 39 वर्षे आणि आरोपी यश तोमर (ठाकूर) वय 20 वर्षे यांच्यात काही कारणावरून आपसी वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या यश ठाकूरने तुळशीराम यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. या गंभीर हल्ल्यात तुळशीराम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. काही तासांतच आरोपी यश ठाकूर याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण काय होते आणि हा वाद नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतक राजूची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची
या घटनेत मृत्यू झालेल्या राजू कांबळेची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे सांगितले जात आहे. राजू दारू पिऊन महिलांकडे वाईट नजरेने पाहत होता. तर अनेक वाटणारी आणि चोरीच्या गुन्ह्यातसुद्धा त्याचा सहभाग होता. एक प्रकारे तो सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा अशा प्रकारे अंत झाला आहे.