• Wed. Mar 11th, 2026

    छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी मंत्री ॲड. आशिष शेलार फ्रान्सला – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी मंत्री ॲड. आशिष शेलार फ्रान्सला – महासंवाद

    मुंबई, दि. १० : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार हे आज रात्री शिष्टमंडळासह फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत.

    11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 दरम्यान ते पॅरिस येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला एका विशेष कार्यक्रमात ते अभिवादन करणार आहेत.

    सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी 11 जुलै 2025 रोजी, युनेस्कोच्या 47 व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र  मंत्री ॲड.शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारणार आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा 12 किल्ल्यांचा समूह “जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण  जगासमोर उभा राहिला आहे. या फेब्रुवारी 2025 मध्ये ॲड.शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र स्वीकारण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याच्या या दौऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान असा गौरवशाली आयाम लाभत आहे.

    या दौऱ्यात मंत्री ॲड. शेलार हे युनेस्कोचे महासंचालक, संबंधित तज्ज्ञ व भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासमवेत स्वतंत्र बैठकींमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रातील इतर प्रस्तावित वारसास्थळांबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. कोकणातील कातळशिल्पे, महाराष्ट्रातील सागरी किल्ले तसेच अमूर्त सांस्कृतिक वारशांतर्गत पंढरपूर वारी, गणेशोत्सव व दहीहंडी यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना या भेटीत नवे बळ मिळेल, असा विश्वास मंत्री ॲड.शेलार यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच वांद्रे, मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘महाराष्ट्र वस्तुसंग्रहालया’साठी पॅरिसमधील नामांकित संग्रहालये, त्यांचे व्यवस्थापन, प्रदर्शनरचना, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा अभ्यास करून त्या धर्तीवर येथील संग्रहालय अधिक समृद्ध करण्यासाठी हे शिष्टमंडळ या दौऱ्यात पाहणी व अभ्यास करणार आहे.

    भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून, 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरीसमधील त्यांच्या या स्मारकाच्या  विशेष कार्यक्रम व मानवंदना सोहळ्यात मंत्री ॲड. शेलार अभिवादन करणार आहेत. “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पॅरिसमध्ये केलेले हे अभिवादन भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नव्याने अधोरेखित करणारे पाऊल आहे,”  असेही त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यामुळे राज्याचा सांस्कृतिक वारसा, पर्यटनक्षमता आणि जागतिक पातळीवरील प्रतिमा अधिक भक्कम होणार आहे.

    ०००

    संजय ओरके/वि.स.अ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed