राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीवर निशाणा साधला.
“घटनेच्या दिवशी सकाळी 7.02 ला सर्वजण पोहोचले. 7.03 मिनिटाला पायलटने बारामतीला फोन करुन विजिबलिटी आहे का? याची चौकशी केली. 7.10 ला सगळं ठिक असल्याचं सांगण्यात आलं. 7.17 ला विदीप जाधव पोहोचले. त्यानंतर 7.50 ला उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. 7.56 ला विमान मुंबई विमानतळाच्या संपर्कात आले. 8.10 ला विमाने टेकऑप केलं. 8.22 ला विमान लोणावळा जवळ आलं. 8.25 ला विमान पुण्याजवळ आलं. 8.30 ला विमान यवत जवळ आलं. 8.32 ला सुपे जवळ आलं. 8.43 ते 8.45 च्या दरम्यान अपघात झाला. 9.00 वाजता अजित दादा जखमी झाल्याच्या बातम्या. 9.45 वाजता दादांचं निधन झाल्याच्या बातम्या आल्या”, असं रोहित पवार म्हणाले.
‘अपघाताच्या दोन दिवस आधी विमान गुजरातला गेलं होतं’
“यानंतर रोहित पवार यांनी विमानाच्या अॅपचे फोटो दाखवले. यामध्ये सर्व विमानांची माहिती मिळू शकते, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. अपघातग्रस्त विमान हे 16 वर्षांपूर्वीचं आहे. अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान मुंबई ते सुरत आणि सुरत ते मुंबई असं फिरलं”, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.
यावेळी रोहित पवार यांनी अपघातानंतर VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांची प्रतिक्रिया दाखवली. विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेन्टेन्ड होते, वैमानिक अनुभवी होते. अपघात विसिब्लिटी इशूमुळे झाल्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया विजय कुमार सिंग यांनी दिली होती. पण स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहता विमान कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असल्याचं रोहित पवार म्हणाले. विमानात यांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
टेक-ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले नव्हते का? चेक करणारे कोण होते? विमानाचा रुटीन मेन्टेन्स झाला नव्हता का? असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले. वीएसआर कंपनीच्या विमानाचा अपघात 2023 मध्ये सुद्धा देखील घडला होता. मुसळधार पाऊस आणि कमी विसिबिलीटीमुळे मुंबई विमानतळाच्या रनवेवरुन घसरलं होतं. पण त्या घटनेचा अहवाल अजून सादर केलेला नाही, असं रोहित पवार म्हणाले.
अपघातग्रस्त विमानात गंभीर त्रुटी, रोहित पवारांचा आरोप
रोहित पवार यांनी अपघातग्रस्त विमानात Stall Warning System बंद होती असा दावा केला. ही सिस्टीम बंद असल्यामुळे काही गोष्टी आधीच कळल्या नाही. त्यामुळे ती घटना कळली नाही, असं तज्ज्ञांचं मत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
