• Mon. Mar 9th, 2026
    Mawal ZP Election Result : ‘दादांची उणीव भासतेय…’; मावळच्या ‘क्लीन स्वीप’नंतर आमदार सुनील शेळके भावुक, विरोधकांवर प्रहार

    अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली मावळचा विकास पुढे नेण्याचा निर्धार शेळके यांनी व्यक्त केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: पुण्याच्या मावळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत भाजपचा सुपडा साफ केला आहे. राष्ट्रवादीने पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीच्या जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तीव्र उणीव भासत असल्याचं सांगितलं. “प्रत्येक निवडणुकीत अजितदादांचा फोन यायचा. ते प्रत्येक क्षणाची माहिती घ्यायचे. आज आमच्यात असं खंबीर आणि पाठबळ देणारं नेतृत्व नाही. हा विजय म्हणजे दिवंगत अजित पवार यांना खरी श्रद्धांजली आहे,” असं सुनील शेळके यांनी म्हटलं.

    ही निवडणूक मामा विरुद्ध भाचा अशीच रंगली होती. भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे आणि त्यांचे भाचे सुनील शेळके यांच्यात निवडणूक प्रचारादरम्यान जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. बाळा भेगडे यांनी “घड्याळाची टिकटिक बंद करू,” असा दावा केला होता. मात्र, निकालानंतर भाजपचा पूर्णपणे पराभव झाल्याने सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांच्यावर निशाणा साधत, “आता गलिच्छ राजकारण थांबवावं,” असा सल्ला दिला.

    सुनील शेळके पुढे म्हणाले, “मागील पाच-सहा वर्षांत आदरणीय अजितदादांनी मावळ तालुक्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा गाव-वाड्या-पाड्यांतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात मावळच्या मायबाप जनतेने हे दाखवून दिलं की, प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहते.”

    Maharashtra TimesSolapur ZP Election Result : सोलापुरात माजी आमदारांचा ‘पॉवर गेम’; लेकाची 6 हजारांच्या मताधिक्याने बाजी; काँग्रेसला मोठा धक्का!

    “आजही आम्हाला अजितदादांची उणीव जाणवते. मात्र, आमच्यासोबत त्यांचे आशीर्वाद आहेत. सुनेत्रा वहिनी यांचं उत्तराधिकारी म्हणून आम्हाला पाठबळ आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मावळमध्ये विकासकामे पुढे नेऊ. हीच आमच्याकडून अजितदादांना खरी श्रद्धांजली असेल,” असंही त्यांनी सांगितलं.

    दरम्यान, बाळा भेगडे यांनी केलेली टीका ही निवडणुकीचा भाग असल्याचं सांगत सुनील शेळके म्हणाले, “प्रचारात अनेक मुद्दे मांडले जातात. आज आपण सुरक्षित आहोत, उद्या दुसऱ्याचं कुटुंब उध्वस्त झालं तरी चालेल, ही भूमिका त्यांनी थांबवावी,” असा घणाघात त्यांनी केला.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा