साताऱ्यातील एका नवरदेवाच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 नगर पंतायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदानाच्या निमित्ताने साताऱ्यातील नवरदेवाने आधी आपलं नागरीक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर तो लग्न कार्यासाठी गेला. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक तर ग्रामीण महाराष्ट्राचा कणाच मानला जातो. कारण ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी या संस्था महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन वारंवार केलं जातं. विशेष म्हणजे याच गोष्टीचं गांभीर्य ओळखत साताऱ्यात एका नवरदेवाने लग्नाला जाण्याआधी आपला मतदानाचा अधिकार बजावला. या नवरदेवाची सध्या साताऱ्यात चांगलीच चर्चा होत आहे. या नगरसेवकाचं कौतुकदेखील होत आहे.
नगरसेवकाचं स्तुत्य काम
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. त्यामुळे प्रत्येक जण या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचं कर्तव्य बजावत आहे. कराड तालुक्यातील तांबवे गावात एका नवरदेवाने आपल्या लग्नाआधी मतदान केंद्र गाठले. सहकुटुंब मतदान केलं अन् मगच त्याचं वऱ्हाड पुण्याला रवाना झालं.
हल्ली मतदानाच्या बाबतीत मतदारांमध्ये मोठी जागृती झाली आहे. त्यामुळे मताचा अधिकार मिळालेले नवतरूण उत्साहाने मतदान करत आहेत. त्याचबरोबर वृद्ध आणि दिव्यांग मतदार देखील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा अधिकार बजावतात. तांबवे (ता. कराड) गावातील विक्रम पाटील या तरूणाचे आज पुण्यात लग्न आहे. पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर लग्न सोहळा असल्याने वेळेवर पोहोचणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन त्याने राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि मग तो पुण्याकडे रवाना झाला.
नवरदेवानं सकाळी लवकर आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. मतदानासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या नवरदेवाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या सोबत कुटुंबातील महिला आणि करवल्या देखील मतदानासाठी आल्या होत्या. त्यामुळे मतदान प्रतिनिधींनी नवरदेवासोबत फोटो काढले. नवरदेवासाठी सुद्धा हा दिवस संस्मरणीय ठरला. मतदानामुळे मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना प्रत्यक्ष लग्नाला जाणे शक्य नव्हते. त्यांनी मतदार केंद्रावरच त्याच्या सोबत फोटो काढून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
