सीआयडी चौकशीला सुरुवात
मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबद्दल पूर्ण चौकशी होणे बाकी आहे. या अपघात प्रकरणात सरकारने सीआयडी चौकशीची घोषणा केली आहे. त्यानुसार ‘सीआयडी’च्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.
कोणकोणते प्रश्न विचारले?
अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्याकडून सीआयडीने बारामती दौऱ्याची माहिती घेतली. ही चौकशी चार तासांहून अधिक वेळ सुरू होती. त्यांना अजित पवार यांच्या २८ जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचे तपशील, २७ जानेवारी रात्रीच्या चर्चा आणि इतर संबंधित माहितीविषयी प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांच्या उत्तरांमधून अपघाताच्या कारणांसाठी तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर तपशील काही गोष्टी कारणीभूत ठरल्या का, याचा अंदाज बांधण्यासाठी वापर केला जाणार आहे. राज्यातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठा संशय व्यक्त केल्याने त्या अनुषंगानेही सीआयडीचे अधिकारी चौकशी करीत असल्याचे समजते.
तीन टप्प्यात तपास
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास तीन टप्प्यांमध्ये केला जाणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनाचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहितीचे संकलन पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केले जाणार आहे. विमान जमिनीवर आदळल्यानंतर बाहेरील बाजूस नेमका काय परिणाम झाला, विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या सांगाड्यासंदर्भातील माहिती मिळू शकणार आहे.
अनेकांना घातपाताचा संशय
दरम्यान, ‘अजित पवार यांचे विमान जमिनीवर लँड होण्यापूर्वीच त्याचा स्फोट झाला,’ असा खळबळजनक दावा बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. या घटनेचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अजितदादांच्या विमानाचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त केला.
लँडिंगचा अँगल चुकला की तांत्रिक बिघाड, अजितदादांच्या अपघाताचं कारण काय ?
सोनवणे म्हणाले, ‘अजित पवारांच्या विमानाचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. त्यानुसार विमान जमिनीला टेकण्याआधीच स्फोट झाला. त्यानंतर दुसरा स्फोट झाला असे दिसते आहे. विमान जमिनीवर उतरण्याआधीच स्फोट झाला असेल, तर विमानामध्ये बॉम्ब होता का? बॉम्बने विमान हवेत उडवले गेले का? नेमके काय घडले, ज्यामुळे विमानाचा स्फोट झाला, याची चौकशी झाली पाहिजे. तो घातपात की अपघात याचादेखील तपास झाला पाहिजे आणि सत्य बाहेर आले पाहिजे.’