पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आठवडा होऊन गेला आहे. २८ जानेवारीच्या सकाळी अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवारांचं विमान कोसळलं. या अपघातात विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी बारामतीला जात होते. त्यांचं विमान धावपट्टीपासून ५० मीटर दूरवर कोसळलं.
या अपघाताचे साक्षीदार असलेल्या कल्याण आटोळे यांनी संपूर्ण घटनाक्रम कथन केला. ते गोजूबावी गावचे सरपंच आहेत. ‘सकाळी ८.३५ ते ८.४० दरम्यान विमानानं गावाला दोन घिरट्या घातल्या. उतरायच्या वेळी विमान डावीकडे कललं आणि पुढच्या काही सेकंदांत विमान पडलं. आम्ही ते लांबून पाहिलं. त्यानंतर आम्ही सगळेच विमानाच्या दिशेनं धावलो. तेव्हा मोठ्या प्रमाणात धूर होता. पण जाळ जास्त मोठा नव्हता. विमान पुढच्या बाजूला पेटलेलं होतं. मी तिथे पोहोचल्यावर उजव्या बाजूला गेलो आणि निळ्या रंगांची पँट घातलेला एक माणूस मला ३ ते ४ सेकंद उघडलेल्या दरवाज्यात दिसला. केवळ ३ ते ४ सेकंदच तो मला दिसला,’ असं आटोळे यांनी सांगितलं.
मी विमानाच्या जवळ उभा होतो. तितक्यात मला आमच्या गावातील एकानं आवाज दिला. त्यानं मला मागे होण्यास सांगितलं. स्फोट होण्याची भीती असल्याचं तो म्हणाला. त्यावेळी मी मागे सरकलो आणि मोठा स्फोट झाला. त्यानंतर विमानाचे तुकडे हवेत उडाले. स्फोट झाल्यावर मी डाव्या बाजूला गेलो. तर २०-२५ फुटांवर दादा पडलेले होते. पण दादांना आम्ही ओळखलं नाही. कारण ते विमान दादांचं आहे, हे आम्हा कोणालाच माहीत नव्हतं. त्याचवेळी किरण दादा गुजर तिथ आले. हे विमान दादांचं आहे आणि हे पडलेले दादा आहेत, असं गुजर यांनी सांगितलं. त्यानंतर गुजर मोठ्यानं रडू लागले. त्यामुळे आम्ही घाबरलो. आम्हाला काही कळेनासं, सुचेनासं झालं, असा घटनाक्रम आटोळे यांनी सांगितला.