“अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आम्हा लोकांसमोर जे संकट आहे, त्यातून परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं, यावर आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाशी संबंधित आम्ही कोणाशी चर्चा करत नाही,” असंही विलीनीकरणाबाबत बोलताना शरद पवारांनी म्हटलं आहे. तसंच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला याचा आम्हाला आनंद आहे. त्यांना संधी दिली, याचा आम्हाला आनंद असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवसांतच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याबाबतही शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र मला त्यावर भाष्य करायचं नाही, असं म्हणत पवार यांनी बोलणं टाळलं.