22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मुंब्रातील डीसीबी बँकेसमोरील खाडीमशीन रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. फरजाना मोहम्मद फिरोज मन्सुरी या आपल्या दोन मुलींसह रस्ता ओलांडत असताना एक अनोळखी बुरखाधारी महिला त्यांच्याजवळ आली. “मी समोरच जाते” असे सांगत तिने फरजाना यांची तीन महिन्यांची मुलगी, आफिया हिला मांडीवर घेतले आणि क्षणातच गर्दीचा फायदा घेत पळ काढली. काही क्षणांतच बालिकेचा माग न लागल्याने कुटुंबीयांनी घाबरून मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
Beed Crime : क्लासवरुन घरी परतताना विद्यार्थिनीवर रिक्षात अत्याचार, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा; बीडमध्ये खळबळ
तक्रार दाखल होताच मुंब्रा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपासाला वेग दिला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चार स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता अपहरण करणारी महिला रिक्षाने मुंब्रा स्टेशनकडे गेल्याचे स्पष्ट झाले. पुढे ती एका पुरुषासह लोकल ट्रेनने मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याचे आढळून आले. भांडुप, घाटकोपर, कुर्ला आदी स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांच्या हालचाली टिपण्यात आल्या.
कपडे बदलून लपण्याचा प्रयत्न
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी बाळाचे कपडे तसेच स्वतःचा पेहराव बदलल्याचेही तपासात उघड झाले. दरम्यान, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींसोबत असलेल्या आणखी एका महिलेचा माग काढण्यात आला. तपास पथक इन्शानगर, शादी महल परिसरात पोहोचले, जिथे नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशीत अपहृत बाळ अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील खेटरी येथे असल्याची महत्त्वाची माहिती मिळाली.
Badlapur Local Accident: धावत्या लोकलमध्ये चढणं बेतलं जीवावर; बदलापुरात नवविवाहितेचा करुण अंत, हादरवणारे CCTV फुटेज समोर
या माहितीच्या आधारे तात्काळ अकोल्यात छापा टाकून मोहम्मद गुलाब आणि खैरुणीसा मोहम्मद या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अपहृत तीन महिन्यांची चिमुकली आफिया हिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. बाळ आईच्या कुशीत परतताच कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
मुंब्रा बालअपहरणप्रकरणाचा अवघ्या सहा दिवसांत उलगडा करून आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून नागरिकांकडून मुंब्रा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. या घटनेत अखेर मानवतेचा विजय झाला असून संपूर्ण परिसराने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
