• Fri. Mar 6th, 2026

    सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या अन् काहीच मिनिटांत पंतप्रधान मोदींची पोस्ट

    सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या अन् काहीच मिनिटांत पंतप्रधान मोदींची पोस्ट

    मुंबई

     महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजभवन येथे त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

    पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

    शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे. “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्याबद्दल सुनेत्रा पवारजी यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्या जनहितार्थ अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे ‘व्हिजन’ यशस्वीपणे पुढे नेतील, असा मला ठाम विश्वास आहे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    राजकीय अपरिहार्यता

    विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. अर्थ आणि क्रीडा यांसारखी महत्त्वाची खातीदेखील त्यांच्याकडे होती. मात्र, २८ जानेवारी रोजी बारामतीकडे जाताना झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचे निधन झाले. या धक्कादायक घटनेनंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाने सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून एकमताने निवड केली. या नियुक्तीनंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

    पवार कुटुंबातील अंतर

    दरम्यान, एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या शपथविधीला सर्वजण उपस्थित असताना, दुसरीकडे मात्र शरद पवार गटाने या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. शरद पवार यांनी आपल्याला या शपथविधीबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या नणंद खासदार सुप्रिया सुळे या शपथविधीवेळी बारामतीत होत्या.

    प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, “मी येथे केवळ माझ्या काकींची (अजितदादांच्या आई) भेट घेण्यासाठी आले आहे. उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने मला दिल्लीला रवाना व्हायचे आहे.”

    शपथविधीशी संबंधित कोणत्याही राजकीय प्रश्नावर त्यांनी भाष्य करणे टाळले, ज्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed