सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती सोपवण्यात आली आहेत, तर अजित पवारांकडे असलेली नियोजन आणि वित्त खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत.
‘कठीण प्रसंगी सुनेत्रा पवार यांचा धाडसी निर्णय’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाचे विशेष कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “प्रसंग कठीण होता… पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.” हा शुभेच्छा देण्याचा प्रसंग नसून, एका जबाबदारीचा स्वीकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कठीण प्रसंगी अजित पवार यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “आपण, अजितदादांचा वारसा त्या (सुनेत्रा पवार) समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरेल.
भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत,” असे त्यांनी म्हटले आहे.