• Sun. Mar 15th, 2026
    Ajit Pawar : अवघ्या सहा तासांत उभारला चौथरा, प्रशासनाकडून वेगाने बॅरेकेडिंग; बंदोबस्तासाठी राज्यभरातून कर्मचारी

    Ajit Pawar Died in Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    अजित पवार बारामती विमान अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाल्यानंतर तेथील तयारीसाठी प्रशासनाची धावपळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने अवघ्या सहा तासांत ‘प्रि-कास्ट’च्या मदतीने दहा मीटर बाय दहा मीटरचा चौथरा उभारला. गर्दी आवरण्यासाठी मजबूत बॅरिकेडिंग उभे केले, तर मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था उभारून उपस्थितांना अंत्यसंस्कार पाहता येतील, याची व्यवस्था केली होती.

    राज्यावर शोककळा पसरली

    अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता पसरताच राज्यावर शोककळा पसरली होती. पवारांचे पार्थिव तेथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात नेल्यानंतर तेथे एकच गर्दी झाली होती. नागरिकांच्या दर्शनासाठी पार्थिव बुधवारी सायंकाळी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तेथील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बारामतीमधील अजित पवार यांचे सहकारी, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन आवश्यक व्यवस्था उभी करण्यासाठी धावपळ सुरू झाली.
    Maharashtra TimesAjit Pawar : अजित पवारांच्या अंत्यविधीला जायचं होतं पण… जुना सहकारी हळहळला, कारण सांगताना रडला, महिन्याभरापूर्वी दादांसोबत…अजित पवारांचे पार्थिव तेथे आणण्यापूर्वी कार्यकर्त्यांना दर्शनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी या प्रांगणात रात्री अकरापर्यंत राहिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंत्यविधीसाठी चौथरा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला चौथरा मैदानाच्या मधोमध उभा करण्याची तयारी सुरू झाली. तो अर्धवट तयार झाल्यानंतर पुन्हा त्याची जागा बदलण्यात आली. त्यानुसार चौथरा पुन्हा उभा करण्यासाठी यंत्रणेने वेग वाढवला आणि सकाळी सहाच्या सुमारास हा चौथरा तयार झाला होता.

    भक्कम बॅरिकेडिंग

    अंत्यसंस्कारावेळी कार्यकर्ते भावनावश असल्याने बॅरिकेडिंग अधिक भक्कम असावे, असा पोलिसांचाही आग्रह होता. ‘व्हीआयपीं’साठी स्वतंत्र मार्ग तयार करावा लागणार होता. यासाठी वेळ अत्यंत मर्यादित होता. मात्र, यंत्रणांनी ही जबाबदारी यशस्वी पेलवली. कार्यकर्त्यांना अत्यंविधी पाहता यावा, यासाठी डिजिटल स्क्रीन उभारण्याचे नियोजन होते. त्यासाठी पुण्यातून वेगवेगळे स्क्रीन रात्रीतून बारामतीत आणण्यात आले.
    Maharashtra TimesSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग उद्यापासून 3 फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद, कुठे-कधी रस्ते बंद? कारण काय?

    बंदोबस्तासाठी राज्यभरातून कर्मचारी

    अंत्यविधीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लागणार होता. वाहनांची होणारी गर्दी टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागणार होती. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी शेजारील जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. कोल्हापूर परिक्षेत्रातून पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. बारामतीतील नागरिक; तसेच बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांनीही शिस्त पाळत आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा