• Fri. Mar 6th, 2026
    पिंकीचे शेवटचे शब्द आठवून माळी रडायला लागले, वरळी गहिवरली; भावाला वैमानिक करण्याचं स्वप्न अधुरं

    Ajit Pawar Plane Crash Updates : जिद्दीच्या जोरावर करिअरची झेप घेतलेल्या पिंकीचे नवी भरारी घेण्याचे स्वप्न मात्र अपघातामुळे वयाच्या २९व्या वर्षीच भंगले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    समीक्षा राणे, मुंबई : एकेकाळी विमानतळावर काम करणाऱ्या वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टींमुळे आकाशाकडे पाहण्याची सवय पिंकी माळी हिला लागली आणि तिने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत विमानसेविका बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. मेहनत, जिद्दीच्या जोरावर करिअरची झेप घेतलेल्या पिंकीचे नवी भरारी घेण्याचे स्वप्न मात्र अपघातामुळे वयाच्या २९व्या वर्षीच भंगले.

    पिंकीचे शेवटचे शब्द

    ‘पप्पा, मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामतीला जाणार आहे. त्यानंतर नांदेडला जाईन आणि तेथील हॉटेलमध्ये पोहोचताच तुम्हाला फोन करीन.’ हे पिंकीचे वडील शिवकुमार यांच्यासोबतचे अखेरचे संभाषण. शिवकुमार हे हुंदका देत मुलीचे हे शेवटचे शब्द सांगत असताना त्यांच्या घरासह ते राहत असलेल्या वरळी परिसरावरील शोककळा गडद झाली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमान अपघातात मृत्युमुखी पडलेली पिंकी माळी तब्बल पाच वर्षे या क्षेत्रात कार्यरत होती. स्वत: आकाशात झेपावलेल्या पिंकीने आणखी एक स्वप्न पाहिले होते. तिला आपल्या लहान भावाला वैमानिक करायचे होते. त्यासाठी ती मेहनत घेत होती. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने तिच्यावर झडप घातली.
    Maharashtra TimesAjit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचं नेमकं कारण काय? ब्लॅक बॉक्सकडे महाराष्ट्राचं लक्ष, कॉकपिटमधलं शेवटचं संभाषण आता…
    पिंकीचे वडील शिवकुमार माळी काही वर्षांपूर्वी दिल्ली विमानतळावर काम करत होते. त्या काळातील काही घडामोडींमुळे त्यांची नोकरी सुटली. मात्र, त्यांच्या विमानसेवेचा अनुभव पिंकीच्या बालमनावर खोलवर कोरला गेला होता. वडिलांकडून विमानतळावरील गोष्टी ऐकतच ती मोठी झाली आणि तेव्हाच आपण विमान क्षेत्रात काम करायचे, हे स्वप्न तिने उराशी बाळगले. सातत्य, प्रयत्न, प्रशिक्षण आणि चिकाटीच्या जोरावर पिंकीने खासगी विमानांमध्ये फ्लाइट अटेंडण्ट म्हणून स्थान मिळवले.

    आपल्या कार्यकाळात पिंकीने राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्यासह अनेक नेत्यांसोबत प्रवास केला. गेले तीन दिवस ती अजित पवार यांच्यासोबत दौऱ्यावर होती. हा दौरा संपल्यानंतर ती नांदेड येथे जाणार होती. मात्र, तो प्रवास अपूर्णच राहिला.

    २७ जानेवारीच्या रात्री पिंकीने वडिलांना शेवटचा फोन केला. उद्या सकाळी लवकर अजितदादांसोबत बारामतीला जाणार असून, त्यानंतर नांदेडला जाणार असल्याचे तिने सांगितले. हेच तिचे वडिलांसोबतचे शेवटचे बोलणे ठरले. अजित पवार यांच्यासोबत प्रवास करण्याची ही पिंकीची चौथी वेळ होती, अशी माहिती तिच्या वडिलांनी माध्यमांना दिली
    Maharashtra TimesAjit Pawar : दादांच्या मृत्यूबाबत शरद पवारांपासून आधी लपवलेलं; तुम्ही असे का उभे आहात? ‘त्या’ गोष्टीमुळे शंका येताच काकांनी विचारलं अन्…
    ‘पिंकी लहानपणापासूनच मेहनती होती. ती अतिशय मनमोकळा स्वभाव, हुशार आणि कुणाशीही वाद न घालणारी तरुणी होती’, असे तिचे नातेवाईक आणि शेजारी सांगतात.

    Ajit Pawar Demise : लाखांचा पोशिंदा गेला, बारामतीकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा