• Fri. Mar 6th, 2026
    Ajit Pawar : ‘सूर्याच्या साक्षीनं दादांचं काम सुरू व्हायचं, काळानं पोरकं केलं…’; रूपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट व्हायरल

    Rupali Chakankar Post : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. रूपाली चाकणकर यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे म्हटले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. दादांच्या अकाली एक्झिटवर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. दादांनी सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले होते. शब्दाचे पक्के, निडर आणि निर्भिड दादांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. कामाचा माणूस म्हणून आपली छाप पाडलेले दादा आता आपल्यात राहिले नाहीत. बारामती येथे विमान रनवेवर लँड करताना ही दुर्घटना घडली. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा दादा आता राहिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या मृत्यूनंतर राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला. दादांच्या निधनानंतर प्रत्येकजण दादांसोबतची आठवण किंवा शोक संदेश लिहित आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केल्याचं म्हटलं आहे.

    आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली. सूर्याच्या साक्षीने दादांचं काम सुरू व्हायचं, काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
    Maharashtra TimesAjit Pawar Death : ‘हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही’, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
    आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे. महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे, असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाल्याच म्हणत चाकणकर यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा