Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळ विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झालं. या दुर्घटनेत त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला असून वकील नितीन सातपुते यांनी या अपघातावर संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात ाबाबत संशय व्यक्त करताना म्हटलं आहे की, “अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटत आहे. या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं किंवा यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्याबाबतही सीबीआयकडून चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी वकील सातपुते यांनी केली आहे.
कसा झाला विमान अपघात?
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून उड्डाण घेतलं होतं. हे विमान 40 मिनिटांत बारामतीतील विमानतळाच्या जवळ आलं. परंतु विमान लँड करत असताना अखेरच्या क्षणी मोठा अनर्थ घडला. पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आलं आणि हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं. या विमान अपघातानंतर प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. “पहिल्यांदा विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं आणि नंतर विमान फिरलं. काही क्षणांत हे विमान खाली जमिनीवर कोसळलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत या अपघातग्रस्त विमानाचे तुकडे उडाले,” असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
विमानात कोण-कोण होतं?
अजित पवार यांच्यासह अपघातग्रस्त विमानामध्ये एकूण पाच जण होते. त्यांचे मुंबईचे सुरक्षारक्षक विदीप जाधव हे देखील सोबत होते . विमानामध्ये अजित पवार यांच्यासह विदीप जाधव (अजित पवार यांचे खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) हे होते.
