मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत काही दिग्गजांचा पराभव झाला. यामध्ये तिकीट न मिळाल्याने अन्य पक्षांतून भाजप-शिवसेनेत गेलेल्या सर्वाधिक माजी नगरसेवकांचा समावेश आहे. ज्यांनी पक्षप्रवेश केला आणि तिकीटही मिळाले नाही, अशा माजी नगरसेवकांची यादीही मोठी आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भाजप आणि शिवसेनेसमोर आहे. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहापर्यंत असल्याने स्वीकृत नगरसेवकपद देऊन त्यातील काहींचे पुनर्वसन करणार का, असा प्रश्न आहे.
रवी राजा
मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपमध्ये माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रवेश केला. त्यांना भाजपने मुंबई उपाध्यक्षपद दिले. मुंबई महापालिकेत गेले पाच कार्यकाळ नगरसेवक राहिलेल्या रवी राजा यांना काँग्रेसकडून शीव कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र यंदाच्या निवडणुकीसाठीच्या प्रभाग आरक्षण सोडतीत त्यांचा १७६ हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला. त्यामुळे भाजपने धारावीतील प्रभाग क्रमांक १८५मधून त्यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा शिवसेना (उबाठा) पक्षाचे जगदीश थिवालप्पी यांनी पराभव केला. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विनोद मिश्रा
हीच गत भाजपचे विनोद मिश्रा यांची झाली आहे. प्रभाग ४३मधून दुसऱ्यांदा विनोद मिश्रा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अजित रावराणे यांनी पराभव केला. मिश्रा हे त्या भागातील भाजपचे सक्रीय नगरसेवक होते. त्यांना उत्तर भारतीयांचा मोठा पाठिंबा आहे. मात्र त्यांचा पराभव झाल्याने महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपद देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होईल.
शुभा राऊळ
मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ शिवसेनेत होत्या. काही काळापूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेचा झेंडा हाती धरलेला, मात्र अवघ्या तीन महिन्यात त्यांची घरवापसी झाली. नुकतंच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी ठाकरेंना पुन्हा रामराम ठोकत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती धरला. राऊळ यांच्याही पुनर्वसनाचा पेच आहे.
अनिल कोकीळ
शिवसेना (उबाठा) पक्षाने तिकीट नाकारल्याने आयत्यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेले अनिल कोकीळ यांनाही पराभवाची चव चाखायला लागली. प्रभाग क्रमांक २०४मध्ये मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार किरण तावडे यांनी त्यांचा पराभव केला. कोकीळ हे अनुभवी असून बेस्ट समिती सदस्यही होते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांच्या पुनर्वसनाचाही विचार शिवसेनेकडून होऊ शकतो.
शिवसेनेतील दिग्गज
आधी शिवसेनेत असलेले नंतर भाजप आणि पुन्हा पक्षांतर करून शिवसेनेत गेलेले नाना आंबोले यांचा शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार सचिन पडवळ यांनी पराभव केला. नाना आंबोले हे माजी बेस्ट समिती अध्यक्षही आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन हादेखील प्रश्न आहे. दादर-माहीममधील लढतींकडे अनेकांचे लक्ष होते. प्रभाग क्रमांक १९२ मधून मनसेकडून यशवंत किल्लेदार रिंगणात होते. त्यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षातून शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी पत्नी प्रीती पाटणकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. मात्र पाटणकर यांचा पराभव झाला. पाटणकर यांचेही पुनर्वसन शिवसेनेकडून होणार का, याकडे लक्ष लागून आहे.
स्वीकृत नगरसेवक म्हणजे कोण?
राजकीय पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक निवडून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाते. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाची संख्या दहा आहे. मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम पाच (एक) (ब)नुसार दहा नामनिर्देशित सदस्य, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम पाच (दोन) (ब)नुसार दहा टक्क्यांपेक्षा जास्त किंवा दहा सदस्य यापैकी जे कमी असेल, इतकेच स्वीकृत नगरसेवक नेमता येतात. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती महापालिकेच्या आयुक्तांच्या शिफारशींवरून आणि सभागृहाच्या संमतीने होते. अंतिम नियुक्ती महापौरांच्या शिफारशीवरून राज्य सरकार करते. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राजकीय पक्षाला जास्त जागा यामध्ये मिळतात.
भाजपकडे जास्त स्वीकृत सदस्य
गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच होती. नुकतीच ही संख्या दहा करण्यात आली. गेल्या वेळी शिवसेनेच्या ८४ जागा होत्या आणि त्यांच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक, भाजपच्या ८२ जागा निवडणूक आल्याने त्यांच्या वाट्याला दोन आणि काँग्रेसच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक आले होते. यंदा स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली आहे. भाजपचे उमेदवार जास्त असल्याने त्यांच्या वाट्याला स्वीकृत सदस्य जास्त येतील.