• Fri. Mar 13th, 2026
    Prakash Ambedkar: बाबासाहेबांचं नाव न घेणं महाजनांना भोवणार?; प्रकाश आंबेडकरांनी घेतली मोठी भूमिका

    प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने पालकमंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात न घेतल्याने नाशिकमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला असून, त्यांच्यावर ‘अॅट्रोसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

    नेमकी घटना काय?

    नाशिकमध्ये ७७ व्या प्रजासत्ताक दिन ानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रजासत्ताक दिन हा संविधानाच्या अंमलबजावणीचा दिवस असतानाही, महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात एकदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख केला नाही. पालकमंत्र्यांनी हे नाव जाणीवपूर्वक टाळले की ते विसरले, याबाबत संभ्रम असला तरी या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

    महिला वनरक्षकाचा संताप

    कार्यक्रमात उपस्थित असलेल्या माधवी जाधव नावाच्या महिला वनरक्षकाने या प्रकाराबद्दल भर सभेत संताप व्यक्त केला. “संविधानामुळेच आज सर्व पदे आणि अधिकार आहेत, मग संविधानाच्या जनकाचे नाव घेण्यास विसर का पडला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मला निलंबित केले तरी चालेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्र्यांना जाब विचारला.

    Maharashtra Timesखळबळजनक: मतदान केंद्र शोधता शोधता सापडला बनावट दारूचा अड्डा; सोलापूरात दीड कोटींचा मुद्देमाल जप्त! पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

    प्रकाश आंबेडकरांचा इशारा

    या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांचे समर्थन केले. आंबेडकर म्हणाले की, “मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य ही नीच मानसिकता दर्शवणारे असून तो अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. वंचित बहुजन आघाडीची स्थानिक समिती पोलिसांत तक्रार करत आहे. जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः कायदेशीर मसुदा तयार करून त्यांना कारवाई करण्यास भाग पाडेन.”

    दरम्यान, या प्रकरणामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संविधानाचा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करताना त्यातील मुख्य नायकाचे नाव न घेणे ही मोठी चूक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा