• Sat. Mar 7th, 2026

    Akola Accident: हायवेवर दोन ट्रकचा भीषण अपघात; दोन्ही चालक जागीच ठार, बॉडी छिन्नविछिन्न, रस्त्यावर भयंकर दृश्य

    Akola Accident: हायवेवर दोन ट्रकचा भीषण अपघात; दोन्ही चालक जागीच ठार, बॉडी छिन्नविछिन्न, रस्त्यावर भयंकर दृश्य

    प्रियांका जाधव, अकोला: अकोल्याजवळ महामार्गावर मध्यरात्री दोन ट्रकची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वीर भगतसिंग बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं.

    मिळालेल्या माहितीनुसार, कुरणखेड येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विभागाजवळ पैलपाडा पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. मुर्तीजापुरहून अकोल्याकडे जाणारा ट्रक (एन.एल.01 ए.के.1105) आणि समोरून येणारा ट्रक (एम.एच.28 बि.बी.3667) यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. एका चालकाचे नाव जगजीत सिंग (रा. यवतमाळ) असून, दुसरा चालक देविदास नारायणन (रा. जळका भडंग, खामगाव) असल्याचे समजते.

    अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज उघडे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अथक परिश्रम घेऊन अपघातग्रस्त ट्रकांमधून मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर, मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

    दरम्यान, या मदतकार्यात वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख विजय माल्टे, शाहबाज शाहा, उमेश माल्टे, अक्षय मोरे, तसेच पैलपाडा येथील आपत्कालीन पथकाचे रंजित घोघरे, विरू देशमुख, राम उमाळे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही तासांतच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed