Kolhapur Couple Died In Accident: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूरच्या जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांची आठ महिन्यांची मुलगी या अपघातातून सुखरुप बचावली आहे.
सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर परतताना दुर्घटना
जिगर आणि ऋतिका हे मूळचे कच्छ (गुजरात) येथील रहिवासी असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरातील शिवराई हाईट्स, कळंबा कारागृहाच्या मागे, पाचगाव रोड येथे वास्तव्य करीत होते. जिगर हे प्लायवूड आणि लाकडी दरवाजे तसेच इतर साहित्य निर्मितीचा व्यवसाय करीत होते. कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये त्यांचा व्यवसाय होता. शुक्रवारी सकाळी ते आपल्या आठ महिन्यांची मुलगी वृष्टीसह मोटारीने (MH 09 FV 3877) हुबळीला गेले होते. तेथे नाकराने दाम्पत्य समाजाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झाले. कार्यक्रम आटोपून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने परतताना कोगनोळी चेकपोस्ट नाक्याजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पावतीसाठी थांबलेल्या कंटेनरला (RJ 14 GG 9017) त्यांची मागून जोरदार धडक बसली. भरधाव वेगात असलेल्या मोटारीचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता.
Crime News: बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला संपवलं, रात्रभर बॉडीशेजारी बसून ‘तसले’ VIDEO पाहिले, सकाळी म्हणाली – त्यांना तर…
गाडीत पाळण्याने वाचवले बालिकेचे प्राण
या भयानक अपघातानंतर कारमधील बलून ओपन होऊन ब्लास्ट झाला. पुढे बसलेले जिगर आणि ऋतिका हे दोघे गंभीर जखमी झाले. मात्र, मागील सीटवर पाळण्यात झोपलेली वृष्टी सुखरूप राहिली. कारचा मागील भाग सुरक्षित राहिल्याने तिला किरकोळ दुखापतीच झाल्या. अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले. निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यातील डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, सहायक उपनिरीक्षक विजय पाटील, हवालदार परमानंद मारुसेठ आणि मंजुनाथ कल्याणी यांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली. जखमींना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजता ऋतिकाचा मृत्यू झाला, तर मध्यरात्रीच्या सुमारास जिगरची प्राणज्योत मालवली. वृष्टीवर मात्र उपचार सुरू आहेत.जिगर यांचे नातेवाईक किमाजी नाजी पटेल (इचलकरंजी) यांनी कंटेनर चालक इम्तिहास अनवर अली (रा. राजस्थान) याच्याविरुद्ध निपाणी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी शेंडा पार्कात उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. जिगर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि मुलगी असा परिवार आहे. ऋतिकाचे माहेर पुसेसावळी (ता. कराड, जि. सातारा) येथे आहे. या घटनेमुळे पाचगाव रोड कळंबा परिसर शोकमग्न झाला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
