मुंबई महापालिकेत महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून, भाजपने हे पद शिंदेसेनेला देण्यास नकार दिला आहे. प्रभाग १९० मधून विजयी झालेल्या शीतल गंभीर-देसाई यांचं नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे.
मुंबई महापालिकेचं महापौरपद सलग दुसऱ्यांदा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालं आहे. यानंतर भाजपमधील चार ते पाच नगरसेविकांची नावं महापौरपदासाठी चर्चेत आहेत. यात शीतल गंभीर-देसाई यांचं नाव पुढे आहे. त्या प्रभाग क्रमांक १९० मधून विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना उबाठच्या उमेदवार वैशाली पाटणकर यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. गंभीर अवघ्या १२५ मतांनी विजयी झाल्या.
दादर-माहीम परिसर ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. शीतल गंभीर तिथून निवडून आल्या आहेत. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून विजयी झालेल्या त्या भाजपच्या एकमेव नगरसेविका आहेत. त्यांचे वडील सुरेश गंभीर हे शिवसेनेचे तीन टर्मचे आमदार राहिले आहेत. ते बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. १९९० ते २००९ या कालावधीत ते माहीमचे आमदार होते. सलग चारवेळा ते माहीममधून विजयी झाले.
भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून शीतल गंभीर यांच्याकडे जबाबदारी आहे. शीतल गंभीर यांच्या कामाचं कौतुक खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेतून केलं. आदित्य ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देताना फडणवीस यांनी गंभीर यांचा उल्लेख केला होता. आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही. त्यांच्यासाठी आमच्या उमेदवार शीतल गंभीर पुरेशा आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत.
शीतल गंभीर यांच्या सोबतच माजी उपमहापौर अलका केरकर, राजेश्री शिरवाडकर, रितू तावडे यांचीही नावं शर्यतीत आहेत. अन्य प्रवर्गातूनही महापौरपदासाठी चेहरा दिला जाऊ शकतो. तसं झाल्यास योगिता कोळी आणि प्रीती सातम यांचीही नावं चर्चेत आहेत.
