• Sat. Jun 6th, 2026

    कल्याण-डोंबिवलीत मनसेची ‘लवचिक’ भूमिका! ‘राज ठाकरे महायुतीसोबत पुन्हा येतील’, भाजप नेत्याचं विधान चर्चेत

    कल्याण-डोंबिवलीत मनसेची ‘लवचिक’ भूमिका! ‘राज ठाकरे महायुतीसोबत पुन्हा येतील’, भाजप नेत्याचं विधान चर्चेत

    राज ठाकरे हे भविष्यात महायुतीसोबत येतील, असं वक्तव्य भाजप नेत्यानं केल्यामुळे आता राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या २९ महापालिका निवडणुकांच्या निकालांनंतर सत्तेची गणिते वेगाने बदलू लागली आहेत. कल्याण-डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेल्या डावाला यश आले असून, त्यांना राज ठाकरे यांच्या मनसेची साथ मिळाली आहे. या पाठिंब्यामुळे महापालिकेत आता महायुतीचा भगवा फडकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    कोकणभवनात हालचाली; ५३ + ५ चे समीकरण

    कोकणभवन येथे शिवसेनेच्या ५३ नगरसेवकांनी त्यांचा अधिकृत गट स्थापन केला. याचवेळी मनसे च्या ५ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते आमदार राजू पाटील उपस्थित होते. “आम्ही शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे,” असे राजू पाटील यांनी स्पष्ट केले, तर श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसीत महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला.

    “राज ठाकरेंनी विकासासाठी दिला पाठिंबा” – एकनाथ शिंदे

    मनसेच्या या भूमिकेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला साथ दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे ते वैयक्तिक स्वार्थासाठी निर्णय घेत नाहीत. ते कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करणारे नेते आहेत.”

    Maharashtra Times‘शाळेला दांडी मारायची असली की बाळासाहेबांना मिठी मारायचो अन्…’; उद्धव ठाकरेंनी उलगडल्या मातोश्रीतील हळव्या आठवणी

    “राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील”

    मनसेच्या या भूमिकेनंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मोठे विधान केले आहे. “राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लवचिक भूमिका घेत महायुतीला बळ दिले आहे. येणाऱ्या काळात ते आपले शत्रू कोण आणि पाठीत खंजीर खुपसणारे ‘खरे भाऊ’ कोण, हे ओळखतील आणि पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील,” अशी अपेक्षा बन यांनी व्यक्त केली.

    दरम्यान, असं असलं तरी राज यांनी आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त पुन्हा एकदा त्यांचे भाऊ उद्धव यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर भाषण केलं आहे. मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. तिथे त्यांनी बाळासाहेबांबद्दलचे त्यांचे विचार मांडले. त्यांनी सामनामध्ये एक विशेष लेखही लिहिला आहे. तसेच सोशल मीडियावरुन एक पोस्टही शेअर केली आहे, जीची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा