मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे युतीला बहुमत मिळाले असले तरी, शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजप सत्तेवर येऊ शकत नाही. यामुळे शिंदेसेनेचे महत्त्व वाढले असून, त्यांनी मुंबईत अडीच वर्षांसाठी महापौरपद मागितले आहे.
मुंबईत सत्ता स्थापनेसाठी ११४ हा जादुई आकडा आहे. भाजप आणि शिंदेसेनेचे मिळून ११८ नगरसेवक आहेत. यात शिंदेसेनेचे २९ जण आहेत. भाजपच्या तुलनेत शिंदेसेनेचा आकडा अतिशय कमी असला तरी पालिकेतील संख्याबळ पाहता त्यांच्या नगरसेवकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हीच बाब लक्षात घेऊन शिंदेसेनेनं भाजपकडे अडीच वर्षांसाठी महापौरपद सोडावं, अशी मागणी केल्याचं कळतं. शिंदेसेनेच्या मागणीनं भाजपची मुंबईत कोंडी झाली आहे.
शिंदेसेनेनं मुंबईत महापौरपदाचा विषय ताणलेला असताना भाजपनं ठाण्यात महापौरपदाचा विषय काढला आहे. शिंदे यांना त्यांच्याच स्टाईलनं उत्तर देण्याची खेळी भाजपकडून केली जात आहे. मुंबईत भाजपच्या जागा अधिक असतानाही शिंदेसेनेनं मागणी केली आहे. आता भाजपनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिंदेसेनेचाच कित्ता गिरवला आहे. ठाण्यात शिंदेसेना मोठा पक्ष ठरलेला असतानाही भाजपनं महापौरपदाची मागणी केली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपनं २८, तर शिंदेसेनेनं ७५ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढवली होती. शिंदेसेनेनं सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपनं अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करत शिंदेसेनेची गोची केली आहे. ठाण्यात शिंदेसेनेचं नाक दाबून मुंबईत त्यांचं तोंड उघडण्याचा गेमप्लान भाजपनं आखला आहे. विशेष म्हणजे शिंदेसेनेकडे बहुमतापेक्षा अधिक नगरसेवक असूनही भाजपनं त्यांची कोंडी केली आहे.
मुंबईत शिंदेसेनेनं आखलेला डाव उधळून लावण्यासाठी भाजपनं ठाण्यात डाव टाकला आहे. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पक्षाला अडचणीत आणण्यात आलं आहे. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी महापौरपदाचा विषय काढत शिंदेसेनेची अडचण केली आहे. आता भाजपचे हे डाव’खरे’ ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
