• Sat. Mar 7th, 2026
    महापौरपद देणार असाल, तर समर्थन देतो; ठाकरेसेनेच्या मागणीने ट्विस्ट, प्रत्येकवेळी नमतं घेतलं पण…

    Chandrapur Municipal Election Result : प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने साथ दिली. पण आता आमची इच्छा आहे की, मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा, असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : महापौर आरक्षणाची सोडत पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापौरपद देत असाल तरच समर्थन देऊ अशी ठाम भूमिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतली आहे. दरम्यान, मनपात शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीचा आठ सदस्यांचा एक गट तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. ६६ सदस्य असलेल्या मनपामध्ये भाजपचे २३ तर शिवसेनेचा एक असे मिळून युतीचे २४ संख्याबळ आहे. तर काँग्रेसचे २७ व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ३ सदस्य असल्याने काँग्रेसचे संख्याबळ ३० आहे.

    सत्ता स्थापनेसाठी ३४ ही मॅजिक फिगर आहे. शिवसेना (उबाठा) ६, वंचित बहुजन आघाडी २, अपक्ष २ तर बसप व एमआयएमकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. भाजपला १० तर काँग्रेसला ४ जागांची गरज आहे. आता मनपात शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीचा आठ सदस्यांचा एक गट तयार केला आहे. सत्ता स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची स्थिती असलेल्या शिवसेना(उबाठा)ला काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून समर्थनाबाबत आधीच विचारणा झालेली आहे.
    Maharashtra TimesBMC Election 2026 : राज साहेब, किती वेळा तुम्ही… मनसेबाहेर पडलेल्या संतोष धुरींचा बोचरा सवाल, थेट म्हणाले मनसेची चेष्टा झाली आणि…
    दरम्यान, ‘राज्यस्तरावर महाआघाडी असताना आजवर प्रत्येक वेळेस आम्ही नमते घेतले. त्यामुळे अनेकवेळा पदापासून आम्ही दुरावलो. पण कधीही पदाची अपेक्षा केली नाही. प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने साथ दिली. पण आता आमची इच्छा आहे की, मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा, जो कोणी आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आमचे समर्थन राहील,’ अशी ठाम भूमिका घेतली असल्याचे शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
    Maharashtra TimesSharmila Thackeray : आमचे सगळे नगरसेवक चोरुन नेले होते… शर्मिला ठाकरेंनी खंत मांडली; उद्धव, रश्मी आणि राज… तिघांची नावं घेत म्हणाल्या…
    ‘आमच्या गटाला साथ दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल, तेव्हा मोठ्या मनाने काँग्रेसने आमची इच्छा पूर्ण करावी. मनपातील उर्वरित पदांसाठी फारसा आग्रह धरणार नाही,’ अशीही पुष्टी गिऱ्हे यांनी जोडली.

    आम्ही हरलो नाही, तोडीस तोड उत्तर दिलंय; पराजयानंतरही उद्धव ठाकरेंना दांडगा विश्वास

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा