• Fri. Mar 6th, 2026
    मुंबईत सुरुवातीचे कल कोणाच्या बाजूने? ठाकरे बंधूंची भाजपला जोरदार टक्कर, कोण किती जागांवर पुढे?

    BMC Election Result : मतमोजणीला झाल्यानंतर सुरुवातीच्या अर्ध्या तासाचा कल पाहिला असता भाजप ११, शिवसेना १० जागांवर पुढे आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. भाजप ११ तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना १० जागांवर पुढे आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ११ जागांवर आघाडी घेतली आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६ जागांवर पुढे आहे. त्यामुळे बीएमसी निवडणूक मध्ये महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेसने ५ जागांवर खातं उघडायला सुरुवात केली आहे.

    मतमोजणीला दहा वाजता सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या अर्ध्या तासाचा कल पाहिला असता भाजप ११, शिवसेना १० जागांवर पुढे आहे. महायुतीला एकूण २१ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना १४ जागांवर आणि मनसे ६ जागांवर पुढे आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला २० जागा मिळताना दिसत आहेत.


    मुंबई महापालिकेसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर आज होणाऱ्या निकालाकडे मुंबईसह राज्याचे लक्ष लागून आहे. मुंबईत २२७ प्रभाग असून, १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतपेटीत बंद झाले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ६.९८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढत होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४१ टक्के झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदार मतदान केंद्रात येत होते. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. साडेपाचनंतर मतदान केंद्रात मतदारांना प्रवेशबंदी होती. मात्र, केंद्रांवर लागलेल्या रांगांमुळे आत मतदान सुरूच होते.
    Maharashtra TimesBMC Election Result : मुंबईत मतटक्का घसरला, ठाकरेंच्या पथ्यावर की विरोधात? आकड्यांचा खेळ समजून घ्या
    एग्झिट पोलच्या अंदाजानुसार, मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीचे आव्हान मोडून काढत भाजप-शिवसेना महायुती सत्ता काबीज करण्याची चिन्हं आहेत. ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’च्या एग्झिट पोलनुसार, मुंबई महापालिकेची सत्ता महायुतीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी महायुतीला १३१ ते १५१ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ जागांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस-वंचित आघाडीला १२ ते १६ आणि इतरांना ६ ते १२ जागा मिळतील, असा अंदाज अॅक्सिस माय इंडियाने वर्तवलेला पाहायला मिळत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा