• Sat. Mar 14th, 2026

    ‘तो’ जीवाच्या आकांतानं धावला, पण टोळक्यानं गाठलंच; पोलीस ठाण्यासमोरच कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

    ‘तो’ जीवाच्या आकांतानं धावला, पण टोळक्यानं गाठलंच; पोलीस ठाण्यासमोरच कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

    पुण्यातील दौंड शहरात कायदा सुव्यवस्थेचा धाक संपल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यावर मुख्य चौकात कोयत्याने हल्ला करण्यात आला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    – दीपक पडकर

    पुणे: पुण्यातील दौंड शहरात कायद्याचा धाक संपल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर शहरातील मुख्य चौकात धारदार शस्त्र घेऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, हा पाठलाग थेट पोलीस ठाण्यापर्यंत झाला आणि पोलीस ठाण्याच्या समोरच त्या कार्यकर्त्याला रस्त्यावर पाडून अमानुष मारहाण करण्यात आली.

    नगरपालिका निवडणुकीत उमेदवार राहिलेले आणि पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष आफताब जुनेद सय्यद यांच्यावर १२ जानेवारी रोजी दुपारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात काही जणांनी कोयता उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत त्यांनी वार चुकवला आणि जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत संविधान चौकात, पोलीस ठाण्याच्या अगदी समोर त्यांना गाठले. धावतानाच उतारावर तोल गेल्याने आफताब खाली पडले आणि जमावाने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
    Maharashtra Timesजिथे भाजप-MIMची युती, तिथेच शिंदेसेनेचा मोठा डाव; ‘धुरंदर’ नेत्याला मदतीसाठी साद, निकाल फिरणार?
    या घटनेदरम्यान परिसरात प्रचंड गर्दी जमली होती, वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तरीही जवळच असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हल्लेखोर हातात कोयते घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात आले असतानाही त्यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्याचे चित्र आहे.

    परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झालेला असतानाही “कोणी तक्रार दिलेली नाही” असे सांगून पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याचे सांगितले जात आहे. भरवर्दळीच्या चौकात शस्त्र उगारून दहशत निर्माण होत असताना पोलिस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे दौंड शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, खाकीचा दरारा केवळ कागदावरच उरला आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा